डोंबिवली : डोंबिवलीत गेल्या आठवडय़ात रिपब्लिकन रिक्षा चालक मालक संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने मनमानीने रिक्षा प्रवासी भाडेवाढ करून उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या प्रस्तावित भाडे दर पत्रकाला आव्हान दिले होते. याविषयीची वातावरण निवळत नाही, तोच बुधवारी सकाळी आयरे प्रभागातील शिवसेनेच्या तीन माजी नगरसेवकांनी रिक्षा भाडय़ाचे सुधारीत दर जाहीर केल्याने खळबळ उडाली आहे.

कल्याणचे प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद साळवी यांनी मंगळवारी डोंबिवली, कल्याणमधील रिक्षा संघटनांची बैठक घेतली. या बैठकीत रिक्षा चालकांनी उपप्रादेशिक परिवहन विभागाने यापूर्वी जाहीर केलेल्या भाडे दराप्रमाणे भाडे वसुली करावी. कोणीही रिक्षा चालक, रिक्षा संघटनांनी मनमानी करून रिक्षा भाडे वाढ, सुधारीत भाडे आकारणी करू नये, असे स्पष्ट आदेश आरटीओ अधिकारी साळवी यांनी संघटना पदाधिकाऱ्यांना दिले होते.

बैठकीच्या दुसऱ्या दिवशी डोंबिवली पूर्वेतील आयरे, तुकारामनगर प्रभागाचे शिवसेनेचे माजी नगरसेवक रवी पाटील, नितीन पाटील, माजी नगरसेविका रंजना नितीन पाटील यांनी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचे छबी असलेले रिक्षा सुधारीत भाडे दराचे फलक डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक ते आयरे, तुकारामनगर प्रभागातील रिक्षा वाहनतळांवर लावले आहेत. अशाप्रकारे उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना डावलून परस्पर सुधारीत भाडे आकारणीचा अधिकार या नगरसेवकांना कोणी दिला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

गुरुवार, ९ जूनपासून ही प्रवासी भाडेवाढ लागू करण्यात येणार आहे, असे माजी नगरसेवक नितीन पाटील, रवी पाटील यांनी फलकावरील मजकुरात म्हटले आहे. महाराष्ट्र रिक्षा चालक मालक सेनेचे अध्यक्ष तात्या माने, लाल बावटा रिक्षा चालक मालक सेनेचे अध्यक्ष काळू कोमासकर, महाराष्ट्र चालक मालक सेनेचे कार्याध्यक्ष संजय मांजरेकर, आदर्श रिक्षा चालक मालक सेनेचे अध्यक्ष देवराम चव्हाण यांनी सहकार्य केल्याचे फलकावर म्हटले आहे. मतदारांची सहानुभूती मिळविण्यासाठी सुधारीत रिक्षा दरवाढीचा विषय सेना माजी नगरसेवकांनी हाती घेतल्याने रहिवासी आश्चर्य व्यक्त करत आहेत.

सुधारित भाडे दर

आयर रोड, लक्ष्मण रेषा, तुकाराम नगर येथील नागरिकांच्या मागणीनुसार रिक्षा संघटनांशी चर्चा करून सुधारीत भाडे दर लागू करण्यात आले आहेत. डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक ते आयरे, तुकारामनगर, लक्ष्मण रेषा शेअर पद्धतीत प्रति व्यक्ती भाडे यापूर्वी १० रुपये  होते. ते शिवसेना नगरसेवकांनी १२ रुपये केले आहे. खासगी रिक्षा दर यापूर्वी २० रुपये भाडे होते. ते आता एक रुपयांनी वाढविण्यात आले आहेत.

नागरिक, रिक्षा संघटनांशी चर्चा करून सुधारीत रिक्षा दर लागू केले आहेत. एक ते दोन रुपयांची वाढ आहे. लोकांच्या मान्यतेने हा निर्णय घेतला आहे.

– रवी पाटील, माजी नगरसेवक शिवसेना

डोंबिवलीत राजकीय मंडळींनी सुधारीत रिक्षा भाडे दर फलक लावल्याच्या तक्रारी आल्या आहेत. प्रत्यक्ष पाहणी करून यासंबंधी कारवाईचा निर्णय घेतला जाईल.

– विनोद साळवी, प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण</p>

मूळ भाडे ९ रुपये आहे. ते १२ रुपये करण्याचा अधिकार या मंडळींना केला. आरटीओ दर पत्रकाला हे आव्हान आहे. यामुळे प्रवासी, रिक्षा चालक वाद वाढतील. आरटीओंनी संबंधितांवर कारवाई करावी.

– दत्ता माळेकर, अध्यक्ष, रिक्षा चालक मालक संघटना