कल्याण – कल्याणमध्ये शिवसेनेचे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या समोर मी लढणार, अशा वावड्या उठल्या आहेत. पण पक्षाने मला असे काही सांगितले नाही. फक्त मुक्त संवाद यात्रेच्या निमित्ताने मी राज्यात फिरत आहे. श्रीकांत शिंदे यांच्या समोर लढणे लोकांना खूप आव्हानात्मक का वाटते याचे आश्चर्य वाटते. लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी ते अडचणीचे डोंगर आहेत, पण त्यांना निवडणुकीत आव्हान देणे आम्हाला अजिबात अडचणीचे, आव्हानात्मक वाटत नाही, असे मत बुधवारी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी येथे माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

मुक्त संवाद यात्रेनिमित्त अंधारे कल्याणमध्ये आल्या आहेत. श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात मी लढणार, असे खूप लोकांना वाटू लागले आहे. मला यासंदर्भात पक्षाचा कोणताही निरोप नाही. ज्यावेळी निरोप येईल, त्यावेळी पाहू, असे अंधारे यांनी सांगितले. एकूण वातावरण पाहता येत्या काळात श्रीकांत शिंदे यांना कल्याण लोकसभेची निवडणूक अजिबात सोपी असणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपण शेतकरी पुत्र म्हणून स्वताची प्रतिमा जनमानसात सादर करत आहेत. तशी प्रतिमा ते पुत्र श्रीकांत यांची प्रतिमा लोकांच्यामध्ये सादर करू शकणार नाहीत. कारण ते गर्भश्रीमंत वडिलांच्या, पक्ष फोडण्यात तरबेज असलेल्या मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आहेत, अशी टिपणी अंधारे यांनी केली.

हेही वाचा >>>कडोंमपा नगररचना कर्मचारी अटक प्रकरणात पोलिसांकडून भूमि अभिलेख कार्यालयातील अभिलेखांची तपासणी

गृहविभागाचा राज्यातील वचक संपला आहे. त्यामुळे पोलिसांना कोणी घाबरत नाही. आता निर्जन ठिकाणी नाही तर थेट पोलीस ठाण्यात गोळीबार करण्यापर्यंतच्या घटना घडल्या आहेत. उल्हासनगरमध्ये सत्ताधारी भाजपचे आमदार गणपत गायकवाड शिंदे समर्थक शिवसेनेच्या शहरप्रमुखावर पोलीस ठाण्यात गोळीबार करतात म्हणजे सत्ताधार शिंंदे-फडणवीस यांच्यातील धुसफूस आता टोळी युध्दाच्या रुपाने पुढे आली आहे, असे अंधारे यांनी सांगितले.गोळीबारानंतर कल्याण पूर्वेतील वातावरणात दहशत आणि खूप अस्थिरता दिसत आहे, असे त्या म्हणाल्या.