ठाणे : गेल्या दोन वर्षांपासून आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या ठाणे महापालिकेला गेल्यावर्षी शहर विकास विभागाकडून भरघोस उत्पन्न मिळाल्याने प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला असला तरी यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीलाच पालिका आर्थिक संकटात सापडल्याचे चित्र आहे. २५० कोटींच्या आसपास ठेकेदारांची देयके थकली असून यामुळे दायित्वाचा आकडा ३८०० कोटीवर गेल्याने जमा-खर्चाचे गणित जुळविताना प्रशासनाच्या नाकीनऊ आले आहे. मालमत्ता करापोटी ११२ कोटीचे उत्पन्न पालिकेला प्राप्त झाले असून त्यातूनच गेल्यावर्षीच्या कामांची ठेकेदारांची थकीत २५ कोटींची देयके देण्याचा विचार पालिका प्रशासनाने सुरु केला आहे. करोना काळात ठाणे महापालिकेच्या विविध विभागांच्या उत्पन्न वसुलीवर मोठा परिणाम झाला होता. त्यातच करोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि रुग्ण उपचारांवर मोठा निधी खर्च होत होता. ठाणे महापालिकेचा उत्पन्नाचा महत्वाचा स्त्रोत म्हणून शहर विकास विभाग ओळखला जातो. करोना काळात गृह प्रकल्पांची कामे ठप्प झाल्याने या विभागाच्या उत्पन्नात मोठी घट झाली होती. यामुळे महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती. गेल्यावर्षी करोना निर्बंध शिथिल झाल्यानंतर गृह प्रकल्पांची कामे सुरु झाली आणि या विभागाला गेल्या वर्षभरात भरघोस उत्पन्न मिळाले. या विभागाला ३४२ कोटी रुपयांच्या उत्पन्न वसुलीचे उद्दीष्ट ठरवून देण्यात आले होते. वर्षाअखेर या विभागाला १ हजार ६६ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. यामुळे प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला होता. परंतु यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीलाच पालिकेची आर्थिक स्थिती बिकट झाल्याचे चित्र दिसून येत आहे. करोना काळात पालिकेची आर्थिक स्थिती बिकट झाल्याने पालिकेवर ३५०० कोटी रुपयांचे दायित्व झाले होते. आता हे दायित्व ३८०० कोटींवर गेले असून यामुळे दायित्वाची रक्कम कमी होण्याऐवजी त्यात वाढ होताना दिसून येत आहे. जुन्या कामांची सुमारे २५० कोटी रुपयांची देयके थकली आहेत. ही देयके ठेकेदारांना द्यायची कशी असा प्रश्न प्रशासनापुढे आहे. यंदाच्या वर्षात ८ जूनपर्यंत पालिकेच्या तिजोरीत मालमत्ता करापोटी ११२ कोटी रुपये जमा झाले आहेत. यातूनच ठेकेदारांची देयके टप्प्याटप्प्याने देण्याचा विचार पालिका स्तरावर सुरु आहे. त्यानुसार एप्रिल ते मार्च २०२१ या कालावधीतील ठेकेदारांची २५ कोटींची देयके देण्याचा तर इतर खर्च धरून ऑगस्टपर्यंत एकूण ४० कोटींची देयके देण्याचा विचार सुरु आहे. पालिकेच्या तिजोरीत पैसे नसल्यामुळे पालिका निधीतून शहरात फारशी कामे सुरु नाहीत. सध्या एमएमआरडीएकडून आलेल्या २४० कोटींच्या निधीतून १२७ रस्त्यांची तर १४० कोटींमधून चौक सुशोभिकरण व इतर कामे सुरु आहेत.