ठाणे : ठाण्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काही दिवसांपूर्वी संयमाचा सूर आळवत महाविकास आघाडीच्या आणाभाका घेतल्या असल्या तरी, दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांमधील वाद उफाळूनच येत असल्याचे दिसून येत आहे. ठाणे महापालिकेच्या शेवटच्या सर्वसाधारण सभेत महापौर नरेश म्हस्के यांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांवर टीका केली असून त्याला प्रतिउत्तर देत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी म्हस्के यांना लक्ष्य केले आहे. ठाणे महापालिकेची शेवटची सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. या सभेत माझ्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला येऊ शकत नसाल तर, मी तुमच्यासोबत कशाला राहू, असा इशारा महापौर म्हस्के यांनी राष्ट्रवादीला दिला. तसेच शिवसेना आणि भाजपमध्ये नैसर्गिक युती असल्याचे विधानही त्यांनी केले होते. त्यास राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष परांजपे यांनी प्रतिउत्तर दिले आहे. आम्ही ३० वर्षे युतीमध्ये सडलो, सापाला आम्ही दूध पाजले असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगतात. तसेच महाविकास आघाडी झालीच पाहिजे, असेही ते सांगतात. तर दुसरीकडे ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के हे शिवसेना आणि भाजप नैसर्गिक युतीचे दाखले देत आहेत. त्यामुळे ठाण्याची शिवसेना ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावर की महापौर नरेश म्हस्के यांच्या विचारसरणीवर चालते, याचा खुलासा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी करावा, असा खोचक टोला परांजपे यांनी लगावला आहे. उद्या शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला तर आम्ही त्याचे स्वागत करू, असेही परांजपे यांनी म्हटले आहे.