कल्याण पश्चिमेतील रेल्वे स्थानकाजवळील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या आगारात भुरट्या चोरांचा सुळसुळाट झाला आहे. प्रवासी आसनावर पिशवी ठेऊन पाणी आणणे, स्वच्छतागृहात गेला की या संधीचा गैरफायदा घेत भुरटे चोर आसनावरील पिशव्या चोरून नेत आहेत. दर आठवड्याला दोन ते तीन अशा चोरीच्या घटना घडत आहेत. गेल्या दहा दिवसापूर्वी पालघर येथील एका प्रवाशाची पिशवी चोरून त्यामधील दोन लाखाचा ऐवज चोरट्यांनी बसमधील पिशवीच्या माध्यमातून लंपास केला. कल्याण आगारात इतर जिल्हा, तालुक्याच्या ठिकाणाहून बस आली की आसन पकडण्यासाठी प्रवासी फलाटावरून रिकाम्या आसनावर पिशवी टाकून ठेवतात. बसमधील प्रवासी उतरले की मग बसमध्ये पिशवी टाकलेल्या जागेवर जाऊन बसतात. पिशवी आसनावर टाकून ठेवली की अनेक प्रवासी निश्चिंत राहून पाण्याची बाटली खरेदी, खाऊ खरेदी किंवा स्वच्छतागृहात जातात. या कालावधीत पाळत ठेऊन असलेले भुरटे चोर बसमधील प्रवाशाची पिशवी बसमधून किंवा खिडकीत हात घालून काढून घेतात आणि पळून जातात, अशा प्रवाशांच्या तक्रारी आहेत. आगारात सीसीटीव्ही असुनही असे प्रकार घडत असल्याने प्रवासी हैराण आहेत. कल्याण पश्चिमेतील चिकणघर परिसरातील रहिवासी विजय सुतार (३७, रा. हरिश्चंद्र निवास, छोटा म्हसोबा मैदान बाजुला, कल्याण) हे कल्याण-खेड एसटी बसने कोकणात चालले होते. कल्याण बस आगारात ते सकाळी सहा वाजता कल्याण-खेड बसमध्ये बसले. सदर बस माणगाव येथे थांबा घेते का म्हणून विजय सुतार आपल्या आसनावर जवळील पिशवी ठेऊन वाहकाला विचारणा करण्यासाठी गेले. या संधीचा गैरफायदा घेत चोरट्याने त्यांची आसनावर ठेवलेली पिशवी चोरून नेली. पिशवीत एका कंपनीचे महागडे यंत्र, लॅपटॉप होता. विजय पुन्हा आसनावर बसण्यासाठी आले. त्यांना पिशवी दिसली नाही. महत्वाचे दस्तऐवज असलेला लॅपटॉप, यंत्र असा ५० हजाराहून अधिक रकमेचा ऐवज चोरीला गेला. आगारात शोधूनही पिशवी सापडली नाही. विजय यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. गेल्या महिन्यापासून कल्याण बस आगारात हा चोरीचा प्रकार सुरू आहे. आगाराची सुरक्षा करते काय असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत. सुट्टीचा हंगाम आहे. प्रवासी गडबडीत असतात या संधीचा गैरफायदा भुरटे चोर घेत आहेत. कल्याणाचे बस आगार रेल्वे स्थानक आणि वर्दळीच्या भागात असल्याने चोरांना पळून जाण्यासाठी येथे सोयीची जागा आहे.