महापालिका क्षेत्राला पाणी पुरवठा करणाऱ्या स्टेम प्राधिकरण कंपनीकडून मुख्य जलवाहिनीवरील गळती बंद करण्याचे काम हाती घेण्यात येणार असून, या कामामुळे शहरातील काही भागांचा पाणी पुरवठा बुधवारी बंद राहणार आहे. २४ तासांच्या बंदमुळे ठाणेकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये म्हणून पालिका स्वत:च्या योजनेतील पाणी पुरवठ्याचे विभागवार १२ तासांचे नियोजन करणार आहे. या बंदमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. मानकोली भागातील मुख्य जलवाहीनीवर पाणी गळती होत असून, ही गळती बंद करण्याचे काम स्टेम प्राधिकरणाकडून हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे बुधवार, ३० मार्च रोजी सकाळी ९ ते गुरुवार, ३१ मार्च रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत स्टेम प्राधिकरणामार्फत ठाणे महापालिका क्षेत्राला होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या बंदच्या कालावधीत ठाणेकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये म्हणून पालिकेने स्वत:च्या योजनेतील पाणी पुरवठ्याचे विभागवार १२ तासांचे नियोजन केले आहे. यानुसार बुधवारी सकाळी ९ ते रात्री ९ यावेळेत इंदिरानगर, श्रीनगर, रामनगर, लोकमान्यनगर, वागळे, घोडबंदर रोड , पातलीपाडा, हिरानंदानी इस्टेट, गायमुख, बाळकुम, कोलशेत, आझादनगर या भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर बुधवार रात्री ९ ते गुरुवार सकाळी ९ यावेळेत समतानगर, ऋतूपार्क, जेल, साकेत, रुस्तमजी, कळवा, आकृती, सिध्देश्वर, जॉन्सन, इटरनिटी आणि मुंब्य्राच्या काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.