पुलवामा जिल्ह्य़ात गुरुवारी झालेल्या भीषण आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ३९ जवान शहीद झाले आहेत. गेल्या दोन दशकांतील भारतामधील हा सर्वात मोठा हल्ला आहे. या हल्ल्याचा जगभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. संपूर्ण भारत देश शोकासागरात बुडला आहे. जगभरातील प्रसारमाध्यमांनी या हल्ल्याला प्रसिद्धी देताना दहशतवादांवर टिकास्त्र सोडलं आहे. मात्र, पाकिस्तानातील काही प्रमुख प्रसारमाध्यमांनी दहशतवाद्याची तुलना स्वातंत्र्य सैनिकसोबत केली आहे. स्वातंत्र्याठी लढणाऱ्यांचा भारतयुक्त काश्मीरमध्ये हल्ला, ४४ भारतीय सैनिकांचा मृत्यू अशा मथळ्याखाली बातमी प्रकाशित करण्यात आली आहे.

पाकिस्तानमधील ‘द नेशन’ या वर्तमानपत्रामध्ये दहशतवाद्यांना स्वातंत्र्य सैनिकाचा दर्जा दिला आहे. ‘स्वातंत्र्याठी लढणाऱ्या तरूणांनी भारतयुक्त काश्मीरमध्ये हल्ला केला आहे. ४४ भारतीय सैनिकांचा मृत्यू’ या मथळ्याखाली बातमी छापली आहे. पुलवामा हल्ल्याला भारतीय सरकारने दहशतवादाचा रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. या हल्ल्याचा पाठीमागे जैश-ए-मोहम्मदचा दावाही भारताने केला आहे. मात्र, हा हल्ला जैश-ए-मोहम्मदने केला नाही. हा हल्ला काश्मीर खोऱ्यातील तरूणांनी केला आहे. या हल्ल्याशी जैश-ए-मोहम्मदचा हात नसल्याची गरळ ‘द नेशन’ या वर्तमानपत्रने ओकली आहे.

अन्य वर्तमानपत्र पुलवामा हल्ल्याबाबातचे कव्हरेज –

डॉन – भारत अधिकृत काश्मीरमध्ये आईईडी ब्लाट, ४४ भारतीय सैनिकांचा मृत्यू या मथळ्याखाली बातमी छापण्यात आली आहे.

द एक्सप्रेस ट्रिब्यून – भारत अधिकृत काश्मीरमध्ये सुसाइड अटॅक, ४४ भारतीय सैनिकांचा मृत्यू

पाकिस्तान ऑब्जर्बर – भारत अधइकृत काश्मीरमध्ये झालेल्या स्फोटात ४४ सैनिकांचा मृत्यू

दरम्यान, तब्बल ३५० किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकद्वारे जैश ए मोहम्मदच्या अतिरेक्याने गुरुवारी पुलवामा जिल्ह्य़ात चढविलेल्या भीषण आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ३९ जवान शहीद झाले असून २० जखमी झाले आहेत. गेल्या दोन दशकांतील हा सर्वात मोठा हल्ला आहे. या हल्ल्याने देशभर संतापाची लाट उसळली असून या जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असा गर्भित इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. आदिल दार असे आत्मघातकी हल्ला चढविणाऱ्या अतिरेक्याचे नाव आहे. तो दक्षिण काश्मीरमधील काकेपुराचा आहे. २०१८मध्ये तो जैश ए महम्मदमध्ये सामील झाला होता. सुटी संपवून सेवेत रुजू होणाऱ्या २,५४७ जवानांना ७० वाहनांतून नेले जात होते. दर खेपेस हजार जवानांना नेले जाते, पण यावेळी ही संख्या दुपटीपेक्षा जास्त होती. पहाटे साडेतीन वाजता जम्मूहून हा ताफा निघाला आणि सूर्यास्ताआधी तो श्रीनगरला पोहोचणे अपेक्षित होते. श्रीनगर-जम्मू महामार्गावर अवंतीपुरा येथील लट्टूमोड येथे हा ताफा पोहोचला असताना हा हल्ला झाला. जवानांच्या ताफ्यावर गोळीबारही झाला आणि क्षणार्धात स्फोटक भरलेला ट्रक त्या ताफ्यात धडकल्याने भीषण स्फोट झाला. त्यात ७६व्या बटालियनच्या वाहनाच्या चिंधडय़ा उडाल्या. अन्य काही वाहनांचीही मोठी हानी झाली आहे. काही वाहनांवर गोळीबाराच्या खुणा आहेत. त्यामुळे परिसरात काही अतिरेकी लपून बसले असावेत आणि त्यांनी हा गोळीबार केला असावा, असा तर्क आहे. हल्ला झालेले ठिकाण श्रीनगरहून ३० कि.मी.वर आहे.