जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या बसवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यामध्ये ४० हून अधिक जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. प्रसारमाध्यमे, टीव्ही चॅनेल, व्हॉट्सअप ग्रुप अशा सर्वच माध्यमांवर भारत पाकिस्तान युद्धाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. या युद्ध चर्चांबद्दल जी परिस्थिती भारतात आहे तीच स्थिती पाकिस्तानमध्येही आहे. या हल्ल्यानंतर भारताने वेगवेगळ्या माध्यमातून पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानमधील अनेक वस्तूंचे भाग गगनाला भिडले आहेत. त्यातच भारतामधील पंजाब आणि इतर प्रांतातील शेतकऱ्यांनी पाकिस्तानमध्ये टोमॅटोसारख्या रोजच्या गरजेच्या वस्तू निर्यात न करण्याचा निर्णय घेतला आहे. या वरुनच भारतावर संतापलेल्या एक पाकिस्तानी पत्रकाराचा व्हिडीओ सध्या चर्चाच विषय ठरला आहे.

पाकिस्तानमध्ये भारतीय शेतकऱ्यांनी आपला माल न पाठवण्याचा निर्णय घेतल्याने तेथे टोमॅटोचे दर १८० ते २०० रुपये प्रती किलो इतके झाले आहेत. यावरच ‘सीटी ४२’ या वृत्तवाहिनीवर एक चर्चासत्रादरम्यान संतापलेल्या एका वरिष्ठ वार्ताहाराने भारताने टोमॅटोची आयात बंद करण्याचा घेतलेला निर्णय अयोग्य असल्याचे सांगितले. मात्र भारताचा विरोध नोंदवण्याची त्याची पद्धत अगदीच विनोदी ठरली. कैसर खोखर असं नाव असणाऱ्या या पत्रकराने, ‘भारताला टोमॅटोचे उत्तर पाकिस्तान अणुबॉम्बने देईल.’ अशी मजेदार धमकीही देऊन टाकली.

‘हिंदुस्तानच्या सव्वा अरब लोकसंख्येने पाकिस्तानमधील टोमॅटोवर बंदी आणून चुकीचे पाऊल उचलले आहे. त्यांना अस वाटतं आहे की पाकिस्तान टोमॅटोशिवाय जगू शकत नाही. हे टोमॅटो आम्ही राहुल आणि मोदींच्या तोंडावर मारतो. ज्याप्रकारे भारतीय आज (पाकिस्तानवर) जळत आहेत, सडत आहेत त्याचप्रकारे त्यांचे टोमॅटोही जळतील. भारतातील प्रसारमाध्यमेही पाकिस्तानवर जळतात. मी हिंदुस्तानमधील जनतेला आणि तेथील प्रसारमाध्यमांना हे सांगू इच्छितो की पाकिस्तान एक अणुशक्ती असणारा देश आहे. पाकिस्तानने आपले अणुबॉम्ब ड्रॉइंग रुम सजवण्यासाठी तयार केलेले नाहीत तर ते भारतासाठी तयार केले आहेत, असं मत या पत्रकाराने नोंदवले आहे. पुढे बोलताना सतत कान पकडून तो ‘तौबा तौबा’ असं म्हणत भारताला मजेदार धमक्या देताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. ‘तौबा तौबा पाकिस्तान भारताला टोमॅटोचे उत्तर अणुबॉम्बने देईल. पाकिस्तान टोमॅटोशिवाय जगू शकत नाही असं भारताला वाटत आहे. पण पाकिस्तान आता स्वत:ची टोमॅटो उगवेल आणि ती भारतामध्ये निर्यातही करेल. यासाठी पंजाब सरकारने तयारी सुरु केली असून पाकिस्तान हा जिवंत देश असल्याचे मला भारताला सांगायचे आहे. भारताच्या प्रसारमाध्यमांनी, लोकांनी आणि शहरातील लोकांनी आम्हाला घाबरायला हवं. जेव्हा पाकिस्तानची अणु हत्यारे आणि मिसाइल्स तुम्हाला उत्तर देईल तेव्हा तुम्ही तौबा तौबा करत फिराल. हा भारतासाठी तौबा तौबा करण्याचा वेळ आहे. जिथे जिथे माझा हा आवाज जात असेल तिथे भारतीय जनतेने उठून उभे रहावे आणि पाकिस्तानचे नाव घेऊन तौबा तौबा करावे. पाकिस्तान एक शूर देश असून तो टोमॅटोशिवाय जिवंत राहू शकतो.’ असे मजेदार मत या पत्रकाराने नोंदवले आहे. त्याची वक्तव्ये इतकी मजेदार आहेत की त्याच्या पाठीमागे बसलेले लोकही त्याच्यावर हसताना दिसत आहेत.

भारतीयांनी तर सोशल मिडियावर टोमॅटोचे उत्तर अणुबॉम्बने देण्यास निघालेल्या पत्रकाराची चांगलीच खिल्ली उडवली आहे. पाहुयात असेच काही व्हायरल ट्विटस

ये तौबा तौबा क्या है ये तौबा तौबा

त्यांचेच लोक त्यांच्यावर हसतायत

टोमॅटोसाठी भारतात येऊ नका

२:२० मिनिटांमध्ये २२० वेळा कान पकडले

जोश मे होश खो बैंठा

बहादुर पाकिस्तानी

अजून एक जोक सांगा

मग अणुबॉम्बच खा

हे लहान मुलासारखं झालं

यांना एक टोमॅटो सूप द्या रे

काय आहे हे

दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शांततेची एक संधी द्या असे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन केले आहे. आपण आपल्या शब्दावर ठाम असून भारताने पुलवामा हल्ल्यासंबंधी ठोस पुरावे दिले तर तात्काळ कारवाई करु असे इम्रान खान यांनी म्हटले आहे.