आपल्या देशात असाही एक काळ होता जेव्हा डॉक्टर्स, इंजिनिअर्स यांना समाजात उच्च स्थान होते. त्यावेळी या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांची संख्या तुलनेने कमी होती. मात्र आता देशात इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम शिकवणाऱ्या संस्था आणि विद्यार्थ्यांची संख्या कमालीची वाढली आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने इंजिनिअर्स तयार होत आहेत. परिणामी त्यांचे समाजातील स्थान कमी होताना दिसत आहे.

बेरोजगार इंजिनिअर्स या विषयावर आपण सोशल मीडियावर अनेक मीम्स पाहत असतो. यामध्ये इंजिनिअर्सची खिल्ली उडवली जाते. मात्र सध्या अशी एक घटना घडली आहे, ज्यामुळे इंजिनिअर्सचा मोठा अपमान झाला आहे. तुम्ही इंजिनिअर्सवरील अशी ट्रोलिंग आधी कधीही पाहिली नसेल. एके काळी इंजिनिअर्स मुलांना लग्नासाठी मोठी मागणी असायची. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या लग्नाच्या जाहिरातीने इंजिनिअर्सची पार इज्जतच काढली आहे.

लग्नासंबंधीच्या अनेक चित्र-विचित्र जाहिराती सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र ही जाहिरात पाहिल्यावर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. या जाहिरातीमध्ये स्पष्टपणे लिहलंय, ‘इंजिनिअर सोडून कोणीही चालेल.’ ही पोस्ट वाचल्यावर ‘इंजिनिअर्सचा असा अपमान का केला असेल?’ असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल.

राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर कॅडबरीसह तब्बल ६०० कंपन्यांची चिंता वाढली; नेमकं कारण काय?

तुम्ही आत्तापर्यंत लग्नाच्या जाहिरातीमध्ये विशिष्ट व्यवसाय, जाती किंवा दिसण्याबाबत दिलेले प्राधान्य पाहिले असेल. मात्र व्हायरल होणाऱ्या या जाहिरातीत म्हटलंय, ‘गोरी, सुंदर आणि श्रीमंत कुटुंबातील मुलीला आयएएस/आयपीएस, उद्योगपती/व्यावसायिक किंवा डॉक्टर वर हवा आहे.’ इथंपर्यंत सर्व ठीक होतं. मात्र पुढे लिहलंय, ‘कृपया सॉफ्टवेअर इंजिनिअर कॉल करू नका’

लग्नाची ही जाहिरात उद्योगपती समीर अरोरा यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केली आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलंय, ‘माहिती तंत्रज्ञानाचे भविष्य फारसे चांगले दिसत नाही.’ ट्विटरवर या फोटोला हजारो लोकांनी लाईक केले असून शेकडो लोकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. एका यूजरने लिहिले, ‘ही जाहिरात पाहिल्यानंतर संपूर्ण देशाचेच भविष्य चांगले नाही आहे असे दिसते.’ तर दुसऱ्याने म्हटलंय, ‘इंजिनिअर्स वर्तमानपत्रातील जाहिरातींवर विश्वास ठेवत नाहीत, ते स्वतःच शोधतात.’