‘अग्रलेख’ हा वृत्तपत्राचा कणा मानला जातो. अग्रलेखातून त्या वृत्तपत्राची भूमिका, एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्पष्ट होत असतो. वृत्तपत्रातले अग्रलेख हे इतके प्रभावी असतात की एखाद्या घटनेविषयी लोकांचे मत तयार करण्यासाठी किंवा ते बदलण्याची ताकद त्यात असते म्हणूनच संपादकीय पानावर असणाऱ्या अग्रलेखाचे स्थान हे कैकपटींनी वरचढ आहे. कोणत्याही धमक्यांना भीक न घालता सत्य परिस्थिती आपल्या धारधार शब्दांतून लोकांपुढे मांडण्याची ताकद त्यात असते. पण आज मात्र त्रिपुरा राज्यातल्या अनेक वृत्तपत्रांनी अग्रलेखाची जागा रिकामीच सोडलीच आहे.

त्रिपुरात ‘स्यान्दन पत्रिका’ या बंगाली वृत्तपत्राचे ज्येष्ठ पत्रकार सुदीप दत्त भौमिक यांची कर्तव्य बजावताना हत्या करण्यात आली आणि याच घटनेच्या निषेधार्थ संपादकांनी आपली लेखणी बाजूला ठेवली. वृत्तपत्राच्या संपादकीय पानावर रिकामी ठेवण्यात आलेली जागा बरेच काही सांगून जात होती. जोपर्यंत भौमिक यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू, असा पवित्रा सगळ्यांनी घेतला आहे.

राज्य रायफल दलाच्या जवानाने त्यांची गोळी घालून हत्या केली होती. त्रिपुरा स्टेट रायफल्सचे कमांडंट तपन देबब्रह्मा यांच्याविरोधात भौमिक यांनी बातम्या दिल्या होत्या. आर्थिक अनियमितता, भ्रष्टाचाराची प्रकरणे तसेच तपन देबब्रह्मा यांचे सुरू असलेले विवाहबाह्य़ संबंध याची पोलखोल भौमिक यांनी आपल्या लेखातून केली होती आणि याचाच आकस मनात ठेवून त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप ‘स्यान्दन पत्रिका’ दैनिकाचे संपादक सुबल कुमार डे यांनी केला.

भौमिक यांनी दिलेल्या बातम्यांबद्दल बोलण्यासाठी देबब्रह्मा यांनी भौमिक यांना मंगळवारी मुलाखतीसाठी बोलावले. मुलाखत घेण्यासाठी ते त्रिपुरा स्टेट बटालियनच्या मुख्यालयात पोहोचले. मात्र त्यांना प्रवेश नाकारण्यात आला, त्यावरून भौमिक यांचा जवानाशी वाद झाला आणि त्याने भौमिक यांच्यावर गोळी झाडली. या प्रकरणी देबब्रह्मा यांना बुधवारी सकाळी अटक करण्यात आली.