न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने सुपरओव्हरवर बाजी मारली. मात्र या सामन्यात जसप्रीत बुमराह आपल्या नेहमीच्या फॉर्मात दिसला नाही. तिसऱ्या टी-२० सामन्यात बुमराहने एकही बळी न घेता ४५ धावा दिल्या. यानंतर सुपरओव्हरमध्येही बुमराहच्या षटकावर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी १७ धावा कुटल्या.

भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी सामना संपल्यानंतर आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन, जसप्रीत बुमराहाला गोलंदाजीविषयी सूचना केली.

मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक मानल्या जाणाऱ्या बुमराहला सल्ला देणं मांजरेकरांना चांगलंच महागात पडलं. नेटकऱ्यांनी संजय मांजरेकरांना ट्रोल करत त्यांची खिल्ली उडवली आहे.

दरम्यान न्यूझीलंडच्या धरतीवर भारतीय संघाने टी-२० मालिका जिंकण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. टी-२० मालिकेनंतर भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये ३ वन-डे आणि २ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यामुळे या मालिकेत न्यूझीलंडचा संघ कसं पुनरागमन करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.