देवेंद्रभाऊंनी जबरदस्त भाषण केले. एकदम जुना फॉर्म परत येऊन राहिला ना. विरोधी पक्षनेत्याने भाषण कसे करावे तेच शिकवून राहिले. एकदम बढिया. पाच वर्षांत विरोधी बाकांवरून असा आवाज आला नव्हता. ते समाजमाध्यमांवरच्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणावरून पण काय फिरकी घेतली. मुख्यमंत्री समाजमाध्यमांमध्ये व्यग्र असतात.. सत्ताधारी बाकांवरले शिवसेना आमदार पण खाली मान घालून हळूच हसत होते.. फडणवीसांच्या भाषणानंतर, ‘सदना’तले राजकीय रंग निरनिराळे असले तरी पांढरेच कपडे घातलेल्या तिघा-चौघांनी जुन्या दोस्तान्याला स्मरून, गप्पा मारत मारत उपाहारगृहाची वाट धरली. फे सबुक, व्हॉट्सअ‍ॅपसारख्या आभासी म्हटल्या जाणाऱ्या जगातल्या घडामोडींचे संदर्भ वास्तवात, तेही विधिमंडळात यावेत हे राजकारणाचे बदलते वारे! आजवर अनेक वारे अनुभवलेल्या विधिमंडळाच्या आवारातही आता ‘आभासी’ वारे घोंघावू लागले असल्याचीच ही चुणूक. थंडगार वातावरणात कोचावर बसून वेटरला ऑर्डर दिल्यावर पुन्हा आतल्या भाषणाच्या गरमागरम गप्पा सुरू झाल्या. भाषण जोरदार झाले देवेंद्रभाऊंचे पण जोरजोरातही झाले. तसे ते मुख्यमंत्री असतानाही जोरजोरातच बोलत होते. समोर माइकच नाही जणू. आता तर मौका भी है और दस्तूर भी.. काही क्षणांच्या शांततेचा लाभ उचलत एकाने तेवढय़ात एक कोपरखळी मारून घेतली आणि लगेच पवित्रा बदलत प्रश्न टाकला : ते माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो पण तुमचा माझ्यापर्यंत नाही या आमच्या साहेबांच्या जोकवर आम्ही गेली सव्वा वर्षे तेच तर म्हणत आहोत असे देवेंद्रभाऊ म्हणाले ते काय? उलट देवेंद्रभाऊ काय बोलतात हे नीट टिपून घेऊन योग्य वेळी उत्तरच तर देत आहेत सव्वा वर्षे. जुगलबंदीच तर सुरू आहे नुसती. मग देवेंद्रभाऊंची ही कसली मन की बात?

‘समोरच्या कोचा’वरचा या प्रश्नावर गालातल्या गालात हसला. आणि पुढे वाकू न सांगू लागला, ये मन की बात नाही अंदर की बात है. तुमचं कोणी फु टत नाही म्हणल्यावर कधी दिल्लीवाले तर कधी चंद्रकांतदादा तर कधी सुधीरभाऊंमार्फ त आपण पुन्हा एकत्र येऊ.. आपण पुन्हा एकत्र येऊ.. हेच तर सुचवले जातेय! तुम्हीच राहा मुख्यमंत्री. नंतर आमचा करू. पण पुन्हा एकत्र येऊ. पण तुमचे साहेब ऐकूनच नाही राहिले. शिवसेना देशभर न्यायचा, मोदीसाहेबांच्या सरकारविरोधात राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करायचे असले काय काय आभासी वाटेल, पण आमच्या लोकांना वास्तवात मनाला खुपेल असे बोलून राहिले. मग आमच्याही लोकांनी कधी कं गना तर कधी अर्णबकडून आभासी राजकारण सुरू के ले. आमची सत्ता आलीच असे वाटून राहिले सोशल मीडियावर. पण आभासी राजकारणातून वास्तवात सत्ता येईचना. उलट तुमचे सरकार स्टेबल असल्याचा भास होऊ लागला. सव्वा वर्षांचे दुखणे आहे हे. म्हणून देवेंद्रभाऊंनी एकदम भारी संधी साधली व उद्धवजींना सर्वासमोर सांगून टाकले की आमचा आवाजच तुमच्यापर्यंत पोहोचत नाही..!