तुतारीचा निनाद, वीणेचा झंकार अन् टाळ- मृदंगाच्या गजरात हरिभक्तीच्या नानाविध रंगांची उधळण करणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या साक्षीने शुक्रवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास जगद्गुरू संत तुकाराममहाराजांच्या पालखीने आषाढीच्या सोहळ्यासाठी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. प्रस्थानानंतर पालखी पहिल्या मुक्कामासाठी देहूतील इनामदारवाडय़ात दाखल झाली. शनिवारी सकाळी पालखी आकर्षक रथातून आकुर्डीच्या मुक्कामासाठी मार्गस्थ होईल. प्रस्थान सोहळ्यासाठी दोन दिवसांपासूनच राज्याच्या विविध भागातून देहूत वारकरी दाखल झाले होते. त्यामुळे नगरीचे वातावरण पालटून गेले होते. प्रस्थान सोहळ्याची सुरुवात शुक्रवारी पहाटेपासूनच करण्यात आली. पहाटे पाच वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिरात संस्थानचे अध्यक्ष पंढरीनाथ मोरे व अभिजित मोरे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. सात वाजता पालखी सोहळ्याचे जनक नारायण महाराजांच्या समाधीची महापूजा झाली. त्यानंतर पालखी सोहळ्यातील काल्याचे कीर्तन झाले. ‘पहाती गवळणी तवती पालथी दुधानी’ या अभंगावर संभाजी महाराज मोरे देहूकर यांनी कीर्तन केले. तुकोबांच्या पादुका पालखीचे मानकरी गंगा म्हसलेकर मंडळींच्या ताब्यात दिल्यानंतर टाळ मृदंगाच्या गजरात त्या मुख्य मंदिरात आणण्यात आल्या. सोहळ्याचे विधी सुरू असताना मंदिराच्या परिसरात मात्र वारकऱ्यांच्या भक्तीचे खेळ रंगात आले होते. हरिभक्तीचे विविध खेळ खेळत मंदिराची प्रदक्षिणा घातली जात होती. तुकोबांच्या संगतीने पंढरीच्या भेटीला जाण्याचा आनंद सर्वाच्या चेहऱ्यावर होता. भजनी मंडपात दुपारी पावणेतीन वाजता प्रस्थान सोहळ्याला सुरूवात झाली. तुकोबांच्या पादुकांची महापूजा करण्यात आली. सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील हे या वेळी सपत्नीक उपस्थित होते. खासदार श्रीरंग बारणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार संजय भेगडे आदींचीही महापूजेला उपस्थिती होती. त्यानंतर पादुका पालखीमध्ये ठेवण्यात आल्या. त्यामुळे वारकऱ्यांच्या उत्साहामध्ये भरच पडली. मंदिरातून पालखी बाहेर येताच हा सोहळा डोळ्यात साठविण्यासाठी सर्वाच्याच नजरा खिळल्या. टाळ- मृदंगाचा गजर आणि भक्तिकल्लोळ टिपेला पोहोचला. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर पालखी मुख्यद्वारातून बाहेर पडली. पहिल्या मुक्कामासाठी संध्याकाळी इनामदारवाडय़ात दाखल झाली.