बदलापूर : शतकमहोत्सवी शिवजयंतीचे औचित्य साधून बदलापुरात पहिल्यांदाच जंगी बैलगाडा शर्यतीचे आयोजन रविवारी करण्यात आले. सातारा, सांगली, पुणे, अहमदनगर, नाशिकसह ठाणे, पालघर, रायगड अशा जिल्ह्यांमधून शेकडो बैलगाडा मालकांनी या शर्यतींमध्ये सहभाग नोंदवला. अधिकृतपणे पहिल्यांदाच शहरात होत असलेल्या या बैलगाडा शर्यती पाहाण्यासाठी आसपासची शहरे आणि गावातून मोठय़ा संख्येने प्रेक्षकही उपस्थित होते. त्यामुळे बदलापूर गावाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.बदलापुरात होणाऱ्या शतकमहोत्सवी शिवजयंतीनिमित्ताने बदलापूर गावात जंगी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. श्री शिवजयन्तुत्सव मंडळाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने आयोजित ही जिल्ह्यातील दुसरी तर अंबरनाथ, कल्याण, मुरबाड तालुक्यांतील पहिली शर्यत ठरली. सकाळपासूनच सातारा, सांगली, पुणे, अहमदनगर, नाशिक, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांतून बैलगाडा मालकांच्या वाहनांचे आणि बैलगाडय़ांचे ताफे बदलापूर गावाकडे येत होते. बदलापुरात शाकाहारी, मांसाहारी खाद्यपदार्थ, फळे आणि बैलगाडा सजावटीच्या वस्तू विक्रेत्यांची मोठी गर्दी झाली होती. सकाळी साडेदहाच्या सुमारास पहिली शर्यत पार पडली. यासाठी ७०० मीटरची धावपट्टी यासाठी तयार करण्यात आली होती.सकाळपासूनच शासनाचे प्रतिनिधी म्हणून नायब तहसीलदार संभाजी शेलार, स्थानिक पोलीस, पशू वैद्यकीय अधिकारी, आयोजक प्रथमेश भगत आणि मोठा पोलीस फौजफाटा तैनात होता. सुमारे २०० ते ३०० बैलगाडा, सुमारे हजार बैल आणि पाच ते सात हजार प्रेक्षक या शर्यतींसाठी उपस्थित होते. महाराष्ट्र बैलगाडा शर्यत संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके या वेळी उपस्थित होते.अशी लागते शर्यतबैलगाडा शर्यत ज्या ठिकाणी आयोजित केली जाते त्या ठिकाणी पोहोचताच आपल्या बैलांची कुवत आणि जिंकण्याची शक्यता पाहून बैलगाडा मालक स्पर्धेचे आव्हान नोंदवत असतो. यात बक्षिसात गोंडा आणि बादल्यांची संख्या जितकी मोठी तितके आव्हान मोठे असे मानले जाते, अशी माहिती पंच करुणेश भाटवडेकर यांनी दिली. यात आता आर्थिक आव्हानेही लावली जाते. नोंदलेल्या या आव्हानाला प्रतिसाद देणारा आधी आव्हान देणाऱ्याचे बैल, बैलगाडा त्याचा पूर्वेतिहास पाहतो. त्यानंतर आव्हान स्वीकारले जाते. यातील आव्हानातील काही रक्कम आयोजकांना दिली जाते. तर उर्वरित विजेत्याला मिळते. यातून शिवजंयतीसाठी निधी उभारणीचा प्रयत्न केल्याचे मंडळाचे अध्यक्ष कालिदास देशमुख यांनी सांगितले. स्पर्धा ठरल्यानंतर बैलांना धावपट्टी दाखवली जाते. त्यानंतर शर्यतीला आयोजक झेंडा दाखवतात. मग शर्यत सुरू होते.