वसई, विरार शहरात प्रवेश करण्याच्या मार्गाना स्वत:ची ओळख असावी यासाठी पालिकेने चारही प्रवेश मार्गिकांवर आकर्षक प्रवेशद्वार तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी संकल्पचित्र मंजूर केले असून त्यासाठी ५ कोटी रुपयांच्या खर्च अपेक्षित आहे. लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. वसईत विरार, नालासोपारा, वसई आणि नायगाव अशी चार शहरे आहेत. या शहरांतून आत येण्यासाठी वालीव, सातिवली, पेल्हार आणि विरार असे चार प्रवेश मार्ग आहेत. या मार्गातून शहरात प्रवेश करताना कसलीच ओळख नव्हती. प्रवेश मार्ग ओसाड आणि रूक्ष होते. त्यामुळे शहरात प्रवेश करताना कसलीच जाणीव होत नव्हती. पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी या प्रवेशद्वारांना सजविण्याचा आणि ओळख देण्याचा निर्णय घेतला होता. प्रवेशद्वार कसे असावे यासाठी विविध संकल्पचित्रांचा शोध सुरू करण्यात आला होता. त्यानुसार एकूण ४ मार्गावर ४ वेगवेगळी संकल्पचित्रे निश्चित करण्यात आली आहेत. या ४ प्रवेशद्वारांचा खर्च प्रत्येकी एक ते सव्वा कोटी रुपये आहे. एकूण खर्च पाच कोटी रुपयांचा आहे. संकल्पचित्र नक्की झाले असून या खर्चाला प्रशासकीय मान्यता देऊन निविदा काढण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेचे कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड यांनी दिली.शहराची वेगळी ओळख निर्माण व्हावी हा त्यामागे उद्देश आहे. प्रवेशद्वारावरून शहराच्या भव्यतेची कल्पना यावी यासाठी प्रवेशद्रार भव्य, आकर्षक केले जाणार आहे. त्यासाठी उभारण्यात येणाऱ्या कमानीवर रंगीत दिवाबत्ती केली जाणार आहे. वसईच्या संस्कृतीचे प्रतीक या प्रवेशद्वारातून साकारण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. -अनिलकुमार पवार, आयुक्त, वसई-विरार महापालिका