मुंबई आणि संपूर्ण राज्यभरात मराठी शाळेची होत असलेली दुरवस्था, घसरलेली पटसंख्या यामुळे अनेक सरकारी आणि खासगी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. मात्र शीव येथील शीव शिक्षण संस्थेचे डी. एस. हायस्कूल विविध उपक्रमांनी आजही आपले वर्चस्व टिकवून आहे. उत्तम सोयी-सुविधांमुळे इतर भाषक विद्यार्थीसुद्धा या मराठी शाळेत प्रवेश घेत आहेत.

‘शील घडवते तेच खरे शिक्षण’ असे ब्रीदवाक्य असलेल्या डी. एस. हायस्कूलने आजवर अनेक राजकीय नेते आणि कलाकार घडविले. आज येथे शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी झोपडपट्टीतील आणि गरीब कुटुंबांतील आहेत. शिक्षणापासून वंचित असणाऱ्या मुलांना शिक्षण देणे हा मुख्य उद्देश धरून गेली अनेक वर्षे शाळा कार्यरत आहे. शाळेतील एकूण १५०० विद्यार्थ्यांपैकी ९८ टक्के विद्यार्थी गरीब कुटुंबांतील आहेत. यात धारावी, चुनाभट्टी, अ‍ॅण्टॉप हिल या भागांतील मुलांची संख्या जास्त आहे.

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
An increase in the price of silver compared to gold
सोन्याच्या तुलनेत चांदीच्या दरात वाढ… हे आहे आजचे दर…
Sensex Nifty gains higher as a result of mineral oil prices
तेलाच्या भडक्याने ‘सेन्सेक्स-निफ्टी’च्या दौडीला पाचर

दप्तराच्या ओझ्यावर ई-लर्निगचा तोडगा

दप्तराच्या वजनामुळे पाठदुखी, सांधेदुखी असे गंभीर आजार उद्भवत असल्याने शाळेने ई-लर्निगचा तोडगा काढला आहे. तसेच पुस्तकापेक्षा चलचित्रे अध्ययन प्रक्रियेत अधिक परिणामकारक ठरत असल्याने शिक्षकांनी गणित आणि विज्ञान विषयातील प्रत्येक धडा ‘स्कॅन’ करून प्रोजेक्टरच्या माध्यमातून शिकविण्यास सुरुवात केली आहे. सर्व विद्यार्थ्यांना फक्त १०० पानीच वह्य़ा देण्यात आल्या आहेत. गृहपाठाच्या वह्य़ाही प्रसंगी शाळेतच ठेवल्या जातात. त्यामुळे वह्य़ा-पुस्तकांच्या ओझ्यापासून विद्यार्थ्यांची मुक्तता झाली आहे. अध्ययनाचा दर्जा वाढविण्यासाठी शिक्षकांनाही दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी विषयतज्ज्ञांमार्फत सोप्या पद्धतीपासून विषय कसे शिकवावेत यासाठी शाळा मार्गदर्शन करते.

कसून तयारीवर भर

मुंबईत अनेक शाळा दहावीचा निकाल उंचावण्याकरिता अभ्यासात अप्रगत असलेल्यांना नववीलाच नापास करतात; परंतु शाळा दहावीचा निकाल उंचावण्याकरिता प्रयत्नपूर्वक नववीलाच अभ्यासात कच्च्या असलेल्या विद्यार्थ्यांवर कसून मेहनत घेते. त्यामुळे शाळेचा दहावीचा निकाल ९५ टक्क्यांच्या पुढेच असतो. त्यासाठी १ ते १० जानेवारी असे दहा दिवस दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अखंड शिबिराचे आयोजन करण्यात येते. या काळात शिक्षक आणि विद्यार्थी २४ तास शाळेतच ठाण मांडून असतात. या काळात शिक्षक विद्यार्थ्यांकडून वेगवेगळ्या विषयांवर अभ्यास करून घेतात. विद्यार्थ्यांच्या पाण्यापासून जेवणाची सर्व सोय शाळाच करते.

विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानविषयक जाणीवजागृती निर्माण व्हावी यासाठी शाळेने अत्याधुनिक सुविधा असलेली प्रयोगशाळा उपलब्ध करून दिली आहे. याशिवाय स्थानिक, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्तरावरील विज्ञानविषयक स्पर्धा, उपक्रम यांमध्ये भाग घेण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाते. शाळेने राज्यपातळीवर चार प्रकल्प सादर केले आहेत. ‘शेतकऱ्यांसाठी बहुउद्देशीय साधन’ हा प्रकल्प तयार केला आहे. या प्रकल्पात विजेचा वापर न करता सायकलचे चाक फिरवून धान्यांची मळणी, धान्यावर फवारण्याचे तंत्र विकसित करण्यात आले होते. शाळेकडे एअर-ओ-मॉडलिंग नावाचा एक प्रकल्प आहे. यात विद्यार्थ्यांना विमानाचे सुटे भाग जोडून विमान बनवून ते रिमोटच्या साहाय्याने उडवायचे कसे हे शिकविले जाते.

इंग्रजी संभाषणावर भर

विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेतून आत्मविश्वासपूर्वक संवाद साधता यावा यासाठी पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना ‘इंग्रजी संभाषणा’चे प्रशिक्षण दिले जाते. प्रत्येक दिवशी दोन तास इंग्रजी विषयासाठी दिले जातात. त्यामुळे पहिलीचा विद्यार्थीही शिक्षकांना भेटला तरी सोप्या इंग्रजीत सहज संवाद साधू शकतो. विद्यार्थ्यांमधील इंग्रजी विषयाचा न्यूनगंड कमी व्हावा यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. अनेक पालक आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमात धाडत असतात. त्यामुळेच आम्ही विद्यार्थ्यांची इंग्रजी भाषा सुधारावी यासाठी विशेष प्रयत्न करतो, असे शाळेचे मुख्याध्यापक अंकुश महाडिक यांनी सांगितले.

संगीत, क्रीडा अकादमी

विद्यार्थी संगीतात निपुण व्हावेत आणि संगीताची आवड निर्माण व्हावी यासाठी शाळेने ‘शंकर महादेवन संगीत अकादमी’ येथे सुरू केली आहे. यात शास्त्रीय गायनाचे धडे गिरवले जातात. तसेच क्रीडा अकादमीही सुरू केली आहे. शाळेला मोठे मैदान उपलब्ध नसतानाही शाळेचे विद्यार्थी मोठय़ा संख्येने विविध क्रीडा स्पर्धामध्ये सहभाग घेत आहेत. यासाठी नावाजलेल्या प्रशिक्षकांची नेमणूक केली जाते. शाळेत मल्लखांबासारखा खेळ शिकविला जातो. शाळेचे माजी विद्यार्थी प्रांजल देवणकर सध्या जपानमध्ये मल्लखांबाचे प्रशिक्षण देत आहेत, तर विनया मापिलकर या राष्ट्रीय पातळीवर खेळत आहेत. याप्रमाणे कराटे, ज्युदो यांचेही प्रशिक्षण देण्यात येते.

गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी मदत

हुशार व होतकरू विद्यार्थ्यांनी एनएमएमएस आणि एनटीएस या परीक्षेत यश मिळवावे यासाठी त्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन दिले जाते. त्यामुळे शाळा सोडल्यानंतर पुढील महाविद्यालयीन शिक्षणाकरिता शिष्यवृत्ती मिळावी आणि शिक्षणात खंड पडू नये हा त्यामागचा उद्देश. या वर्षी एकूण ५५ विद्यार्थी एनएमएमएसच्या प्रवेशप्रक्रियेत पात्र झाले आहेत. या परीक्षेची जोरदार तयारी शाळा करवून घेते. त्यासाठी विविध राज्यांतील प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांकडून सोडवून घेऊन सराव करवून घेतला जातो.

शाळा, शिक्षक आणि पालकांमध्ये चांगला संवाद असावा, यासाठी शाळा शिक्षक-पालक समितीच्या बैठका वरचेवर घेते. याशिवाय विविध प्रकारच्या पालक-शिक्षक समित्या नेमण्यात आल्या आहेत. यात परिवहन समितीदेखील आहे. विद्यार्थ्यांचा घरापासून शाळेपर्यंतचा प्रवास सुरक्षित असावा, या दृष्टीने ही समिती काम करते. या समितीतील एक पालक किंवा शिक्षक दररोज विद्यार्थ्यांसोबत बसमध्ये असतो.

सणांचे महत्त्व टिकावे यासाठी सण शाळा उत्साहात साजरा करते. याशिवाय दिनविशेष असल्यास त्या दृष्टीने कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. कारगील दिन, डॉ. अब्दुल कलाम वाचन प्रेरणा दिन असे अनेक कार्यक्रम शाळेने उत्साहात साजरे केले आहेत. याशिवाय आषाढी एकादशीपासून ते गुढीपाडव्यापर्यंत प्रत्येक सण दिमाखात साजरा केला जातो.

सुसज्ज ग्रंथालय

एकूण २४,००० पुस्तकांनी सुसज्ज ग्रंथालय शाळेत आहे. कादंबरी, साहित्य, विश्वकोश यांनी हे ग्रंथालय परिपूर्ण आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची सोय होते. विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात.

 

संकलन – रेश्मा शिवडेकर

reshma.murkar@expressindia.com

– किशोर कोकणे