तेजश्री गायकवाड

फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घेत घेत पुढे तिने ‘राईट या राँग’, ‘ये तो बहुत हो गया’, ‘सेक्शन ३७५’ अशा नावजलेल्या चित्रपटांसाठी वेशभूषाकार म्हणून काम के लं. लहानपणापासूनच तिला लोकांना वेगवेगळे पोशाख देऊन त्यांचा लुक बदलायची ओढ होती, हेच स्वप्न सत्यात उतरवत ती आज फॅशन इंडस्ट्रीमध्ये तरुण फॅशन डिझायनर म्हणून प्रसिद्ध झाली आहे.

नीतू लहानपणापासून वडिलांचा व्यवसाय बघत बघतच मोठी झाल्यामुळे तिची सहजच फॅशन आणि टेक्सटाईल इंडस्ट्रीशी नाळ जोडली गेली. फॅशन डिझायनिंग क्षेत्रातील तिच्याप्रवासाची सुरुवात कशी झाली याबद्दल बोलताना ती म्हणते, मी एका संयुक्त कुटुंबातली मुलगी आहे. आमच्या कुटुंबात आम्ही १५ – २० लोक एकत्र राहतो. मी पक्की मुंबईकर आहे. माझं बालपण शिक्षण सगळं मुंबईतच गेलं. मला  फॅ शनची आवड आहे, माझ्या वडिलांनाही वस्त्रोद्योगाची खूप आवड होती. त्यामुळे असेल ती आवड माझ्यातही आहे. मला लहानपणी स्वत:लाच छान तयार करायला खूप आवडायचं. मला माझ्या कु टुंबातील सगळेच सदस्य पुढे जाऊन तू आमची फॅशन आयकॉन होणार असंच म्हणायचे, असं ती सांगते. मला फॅशनमध्ये प्रयोग करायला खूप आवडायचं त्यामुळे मी कोणत्याही कार्यक्रमाला हजेरी लावायची असेल तर प्रत्येक वेळी आपण कसे वेगळे दिसू याची दक्षता घ्यायचे. या स्वभावातच कुठे तरी भविष्याची बीजं रु जलेली होती, असं तिला वाटतं. तरुण वयात तर नीतूचं फॅशन डिझायनिंगबद्दल प्रेम हळूहळू वाढत गेलं.स्केचिंग, कॅरिकेचर तयार करणे, डिझाइनर कपडे स्केचिंग करणं याचा तिला छंदच जडला. तिने बनवलेली प्रत्येक गोष्ट अप्रतिम होती. त्यासाठी अनेकांकडून तिला प्रशंसाच मिळाली. तेव्हा कुठे आपण जे करतो आहोत, ते लोकांना आवडतं आहे याची खात्री नीतूला पटली आणि हळूहळू तिने एक व्यवसाय म्हणून फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात उतरण्याचे निश्चित केले.

‘माझ्या कॉलेजच्या दिवसात मी बऱ्याच फॅशन शोजमध्ये भाग घेतला. ज्यासाठी मला सलग काही वर्षांत अगदी बॅक टू बॅक अ‍ॅवॉर्डसही मिळाले. ही आठवण मी कधीही विसरू शकत नाही,’ असं नीतू सांगते. खरं तर फॅ शन डिझायनिंगचा अभ्यास झाल्यानंतर लगेचच तिने मालिका क्षेत्रात काम करायला सुरुवात केली होती. ‘तारक मेहता का उलटा चष्मा’सारख्या गाजलेल्या मालिकेसाठी तिने कॉस्च्यूम डिझायनर म्हणून काम केले. मात्र या कामात एका काळानंतर तिला नावीन्य वाटेनासं झालं. मला मालिकेच्या कॉस्च्यूम डिझायनिंगमध्ये नवं काही करता येत नव्हतं, त्यात फार प्रयोग करायला वाव नव्हता. त्यामुळे मी एका एक्स्पोर्ट हाऊसमध्ये काम करायला सुरुवात केली, असं ती म्हणते. या एक्स्पोर्ट हाऊसमध्ये काम करत असताना पहिल्यांदाच तिला फॅशन डिझायनिंगच्या व्यवसायाचे तपशीलही समजायला सुरुवात झाली. हा अनुभव तिच्यासाठी फार महत्त्वाचा ठरला, असं ती म्हणते.

त्यानंतर लगेचच तिने आपला मोर्चा चित्रपट क्षेत्राकडे वळवला. आजही ती चित्रपटांसाठी कॉस्च्यूम डिझायनिंग करते आहे.नीतूचा चित्रपट क्षेत्रातला प्रवास ‘राईट या राँग’ या चित्रपटाने झाला, असं ती सांगते. २०१० मध्ये माझा चित्रपट क्षेत्रातला प्रवास सुरू केला होता. मात्र त्या वेळी लवकरच मला मुंबईच्या बाहेर असलेल्या मोठय़ा कापड कंपनीत काम करण्याची ऑफर मिळाली. हा करार पाच वर्षांचा होता आणि मी संपूर्णपणे कापड आयात-निर्यात करणारी कंपनी असल्यामुळे तिथे नोकरी करण्याचा निर्णय घेतला. पण माझं  मन तुला नेहमीच भारतीय चित्रपटसृष्टीत काम करायचे आहे हे आतून सांगत होते, असं नीतू म्हणते. म्हणूनच २०१६ साली मी अरबाज खान आणि जिमी शेरगिल अभिनित ‘ये तो बहुत हो गया’ या चित्रपटाद्वारे पुन्हा इंडस्ट्रीत आले. हळूहळू मी इंडस्ट्रीत मजबूत पाय रोवायला सुरुवात केली. माझ्या सततच्या प्रयत्नांमुळेच असेल मला अभिनेता धर्मेद्र यांच्या आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठी काम करण्याची आणखी एक संधी मिळाली, पण दुर्दैवाने हा चित्रपट अद्याप प्रदर्शित झाला नाही, असं नीतू सांगते. ‘पुढे मी ‘ओबेरॉय आय बीज सी’च्या जाहिराती साठी काम केलं. त्यानंतरचा या क्षेत्रातला प्रवास अजूनच सुखकर होत गेला, असं नीतू सांगते. ‘मला पॅनोरमा या देशातील आघाडीच्या प्रॉडक्शन हाऊ सकडून ऑफर आली. त्यांनी मला अक्षय खन्ना आणि रीचा चड्डा अभिनित ‘सेक्शन ३७५’ या चित्रपटासाठी करारबद्ध केलं. हा अनुभव अगदी आश्चर्यकारक होता, असं नीतू म्हणते. अशा प्रकारच्या चित्रपटांसाठी काम करायचं हे माझं नेहमीचं स्वप्न होतं. अजय बहल एक अतिशय प्रामाणिक, दयाळू आणि प्रेमळ दिग्दर्शक आहे. त्याच्याबरोबर काम करणं खरोखर मजेदार होतं आणि संपूर्ण कलाकार टीम यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव हा एकाच वेळी थक्क करणारा आणि जागतिक दर्जाच्या कामाचा अनुभव देणारा होता, असं नीतूने सांगितलं.

सध्या नीतू  इमरान हाश्मी आणि निकिता दत्ता, इमाद शहा, दर्शना बनिक, डेन्झिल स्मिथ अभिनीत ‘एज्रा’ या चित्रपटासाठी काम करते आहे. हा चित्रपट एका वेगळ्या शैलीचा आहे आणि १९६० च्या दशकाचा काळ यात दाखवला आहे. त्यामुळे त्या काळानुसार कॉस्च्यूम डिझायनिंग करणं हे नीतूसारख्या फॅ शन डिझायनरच्या दृष्टिकोनातून एकाचवेळी सर्जनशील आणि खूप आव्हानात्मक असा अनुभव आहे. अशा पद्धतीचं सर्जनशील काम करताना तिच्यातला फॅशन डिझायनर सुखावतो, असं ती म्हणते. फॅशन डिझायनिंगचं हे क्षेत्र खूप सर्जनशील आणि रोजच्या रोज वेगळ्या कामाचा, निर्मितीचा अनुभव आणि आनंद देणारं आहे, असं ती म्हणते. लोकांनी त्यांच्या विचारांनुसार त्यांचे कपडे स्वत: ठरवून ते परिधान केले पाहिजेत, असं ती म्हणते. आपल्या कपडय़ांसाठी लोकांनी चित्रपटातील कलाकारांची नक्कल करू नये, असं तिला मनापासून वाटतं. त्यासाठी एक फॅशन डिझायनर म्हणून सातत्याने काही तरी वेगळं, ट्रेन्डी आणि लोकांपर्यंत सहज पोहोचेल, असे कपडे डिझाईन करण्याचा तिचा मानस आहे.

या इंडस्ट्रीमध्ये येऊ  पाहणाऱ्या तरुणाईला ती हाच मोलाचा सल्ला देऊ इच्छिते की फॅशनबद्दल चांगली जाण असेल तरच तुम्ही या इंडस्ट्रीत प्रवेश करू शकाल, असा संकुचित विचार चुकीचा आहे. तुम्हाला जर या क्षेत्रात रस असेल आणि तुमची खूप मेहनत घेण्याची तयारी असेल तर तुम्हाला या क्षेत्रात तुमची वाट मिळाल्याशिावय राहणार नाही, असा विश्वास नीतू व्यक्त करते. तुम्हाला हवं ते मनापासून केलंत, जे करत आहात त्यावर खरोखरच प्रेम केलंत तर तुम्हाला खूप उत्तम अनुभव येईल, असा अनुभवातून गिरवलेला मोलाचा धडाही नीतू तरुण डिझायनर्सना देऊ इच्छिते.

viva@expressindia.com