टिळा लावण्याच्या घरगुती कार्यक्रमात दिलेल्या भोजनानंतर विषबाधा झाल्याने उलटी-जुलाब व चक्कर येऊन त्रास सुरू झाल्याने ३६ जणांना सोलापूरच्या छत्रपती शिवाजी सवरेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील सर्व रुग्णांची प्रकृती सुधारत असून, त्यापैकी बऱ्याच रुग्णांना मंगळवारी सायंकाळनंतर घरी सोडण्यात आले.सोलापूरपासून जवळच असलेल्या निलेगाव (ता. तुळजापूर) येथे सोमवारी रात्री उशिरा हा प्रकार घडला. रुग्णांमध्ये सात बालके व सात महिलांचा समावेश आहे. निलेगावात नवनाथ लक्ष्मण खोत यांच्या घरात टिळा लावण्याचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व पाहुण्यांना रात्री जेवण देण्यात आले. सर्वानी आनंदाने भोजनाचा आस्वाद घेतला. परंतु नंतर थोडय़ाच वेळात विषबाधा होऊन एका पाठोपाठ सर्वाना चक्कर येऊन उलटी-जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यामुळे या सर्व बाधितांना प्रथम अणदूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून नंतर सोलापूरच्या छत्रपती शिवाजी सवरेपचार रुग्णालयात हलविण्यात आले. अजय अंबाजी मुळे (वय १०), धुंडिराज तानाजी कोळी (वय ७), इंदूबाई नवनाथ खोत (वय ४५), सिद्राम शंकर रोटे (वय ६०), सिद्धाराम विठ्ठल मंडोळे (वय २२), गफार मोहम्मद शेख (वय २२), शशिकांत हणमंत खोत (वय १९), जयश्री काशिनाथ मंडोळे (वय ४०) व यशवंत सुधाकर कोळी (वय २७) यांचा रुग्णांमध्ये समावेश आहे.