माळशिरस तालुक्यातील इस्लामपूर येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलशुध्दीकरण केंद्रात तलावात बुडून दोघा मामा-भाच्याचा मृत्यू झाला. तलावात पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले.
वैभव बापूराव कुंभार (वय २५, रा. इस्लामपूर) व त्याचा भाचा श्रीराम नितीन भालेराव (वय १२, रा. महाळुंंग, ता. माळशिरस) अशी दोघा मृतांची नावे आहेत. वैभव कुंभार याचा भाचा श्रीराम हा उन्हाळी सुटीत आजोळी आला होता. हे दोघे मामा-भाचे इस्लामपूर येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलशुध्दीकरण केंद्राच्या तलावात पोहण्यासाठी गेले होते. परंतु पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने व पोहताना दमछाक झाल्याने दोघेही पाण्यात बुडाले व मरण पावले. गावात कॉम्प्युटर सेंटर चालविणाऱ्या वैभव कुंभार याचा चार महिन्यापूर्वीच विवाह झाला होता. माळशिरस पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.