पुस्तकांच्या भरमसाठ किंमतीमुळे पुस्तके विकत घेण्यासाठी वाचकांकडून हात आखडता घेतला जात असल्याचे बोलले जाते. विविध विषयांवरील मराठीतील पुस्तके कमी किंमतीत मिळाली तर वाचक प्रतिसाद देऊ शकतात. मराठीत अजब पब्लिकेशन- डिस्ट्रिब्युटर्सने अशीच एक योजना वाचकांसाठी प्रत्यक्षात आणली आहे. अजबतर्फे विविध विषयांवरील पुस्तके अवघ्या ५० रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची ‘माझी जन्मठेप’, ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’, ‘काळे पाणी’, ‘सहा सोनेरी पाने’, ‘मोपल्यांचे बंड अर्थात मला काय त्याचे’, ‘अंदमानाच्या अंधेरीतून’, ‘हिंदूत्व’, ‘हिंदुराष्ट्र दर्शन’, ‘क्रांतिघोष’ आदी पुस्तके ५० रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. सावरकरांच्या सुमारे ४० पुस्तकांच्या जनआवृत्या प्रकाशित करण्यात आल्या आहेत. साने गुरुजींचे ‘श्यामची आई’ हे १०० रुपये मूळ किंमतीचे पुस्तक सवलतीत अवघ्या २५ रुपयांमध्ये देण्यात येत आहे. साने गुरुजींची सर्व १११ पुस्तके एकूण ५१ खंडांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. १२,५०० रुपये किंमतीची ही पुस्तके ५ हजार रुपयांमध्ये मिळणार आहेत. ना. सि. फडके यांच्या ७० कादंबऱ्यांचा संच ज्याची मूळ किंमत १५ हजार रुपये होते, तो साडेसात हजारांत मिळणार आहेत.