भारतीय संविधान हे जगातील सर्वश्रेष्ठ असून त्याअंतर्गत राहून योग्य अंमलबजावणी झाल्यास देशातील सर्व समस्या सुटतील. देश प्रगतीकडे झेपावेल, असा सूर मंगळवारी येथे आयोजित भारतीय संविधान गौरव संदेश फेरीनिमित्त झालेल्या कार्यक्रमातून निघाला.
येथील संविधान गौरव समितीतर्फे सकाळी संविधान गौरव फेरी काढण्यात आली. भारतीय संविधानाची प्रत, ग्रंथ आणि संविधान गौरवाच्या घोषणा देणारे विद्यार्थी असे फेरीचे स्वरूप होते. डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ फेरीचा समारोप झाला. नगराध्यक्ष गणेश धात्रक यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. प्रारंभी गौरव समितीचे सदस्य एस. एम. भाले यांनी प्रास्ताविकात संविधान दिनाचे महत्त्व मांडले. जामा मशिदीचे मौलाना असलम रिझवी, भन्ते दीपंकर, भन्ते बोधिपाल, अहमद बेग मिर्झा, ज्ञानेश्वर नागपुरे, मयूर बोरसे आदींनी मनोगतातून भारतीय संविधानाच्या महत्त्वावर प्रकाशझोत टाकला. सूत्रसंचालन प्रवीण पगारे यांनी केले.