‘आज शेतीमध्ये प्रयोग करेणही जिकिरीचे झालेले आहे. सातत्याने शेतीत प्रयोगांची गरज असते. यासाठी शेतीतील प्रयोगांना व्यापक प्रोत्साहन दिले पाहिजे.’ असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. अशोक भोईटे यांनी केले.
शेतीप्रगती मासिकाचा आठवा वर्धापन, शेतीप्रगती कृषिभूषण-२०१३ पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय कृषी सहसंचालक डॉ. नारायण शिसोदे, बँक ऑफ इंडियाचे झोनल अरुण नरके, कर्नाटकाचे माजी मंत्री मल्हारीगौडा पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी उमेश पाटील, विकास पाटील उपस्थित होते. शेतीप्रगती मासिकाचे संपादक रावसाहेब पुजारी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
तेजस प्रकाशनाच्या वतीने राजेंद्र घोरपडे यांचे इये मराठीचिये नगरी, प्रताप चिपळूणकर यांचे ‘तण देई धन’ आणि ज्येष्ठ पत्रकार सुधीर कुलकर्णी यांचे शेतीची ‘काटेरी वाट’ या तीन पुस्तकांचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशन झाले. त्यांनतर लेखक कुलकर्णी आणि चिपळूणकर यांनी मनोगत व्यक्त केले.
शेतीमध्ये वेगळे प्रयोग करणाऱ्या पाच शेतकरी आणि दोन विस्तार कार्यकर्त्यांचा शेतीप्रगती कृषिभूषण पुरस्काराने सपत्नीक सन्मान करण्यात आला. यामध्ये भूपाल खामकर, सुरेंद्र बाबू शिरगावे, जंबू अप्पा भोकरे, दिनकर कांबळे, नितीन लोकापूर, सतीश देशमुख आणि दिलीप घाटगे यांचा या वेळी गौरव करण्यात आला.
प्राचार्य श्रीधर हेरवाडे, डॉ. गणेश शिरगावे, सतीश देशमुख, विकास पाटील, मल्हारीगौडा पाटील, अरुण नरके, प्रकाश भागवतवार यांची भाषणे झाली. या वेळी कोल्हापूर, सांगली, बेळगाव जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते. अस्मिता पुजारी यांनी आभार मानले.