उपनगराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर एकांतात गाठून नागरिकांना लुटणाऱ्या टोळी शहर पोलिसांनी जेरबंद केली. टम्या, बटल्या आणि सद्दाम नावाने ओळखल्या जाणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली.
चांद उस्मान शेख (वय ४५) हे प्रभाग एकमधील रहिवाशी शनिवारी (ता. ४) दुपारी अडीचच्या सुमारास शिरसगाव रस्त्याने सायकलवरून घरी जात होते. गायकवाड शाळेजवळून जात असताना रिक्षामधून (एमएच. १५, झेड. १४९३) आलेल्या चौघांनी त्यांना धक्काबुक्की करीत त्यांच्याकडील दोन हजार रुपये हिसकावून घेतले. त्याचवेळी तेथून जात असलेले दिगंबर विनायक सातदिवे यांना मारहाण करीत त्यांच्याकडील गॅस सिलेंडर घेऊन रिक्षातून पसार झाले. याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक अनिल भिसे यांनी आरोपींच्या वर्णनावरून घासगल्लीतून विजय उर्फ टम्या गुलाब आढांगळे (वय २४) यास ताब्यात घेतले. त्याने कबुली दिल्यानंतर त्याचे साथीदार किरण उर्फ बटल्या जगन्नाथ चिकणे (वय २२, रा. प्रभाग ६), सद्दाम नुरा शेख (वय २३, रा. प्रभाग २) यांना जेरबंद केले. तिघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. शहर पोलीस टोळीतील इतर आरोपींचा शोध घेत आहेत.