मे महिन्यातील शेवटच्या व सलग सुट्टय़ांना, शनिवार-रविवारी महाबळेश्वर, पाचगणी पर्यटक आणि वाहतुकीच्या लोंढय़ांनी पॅक झाले.
देश-विदेशातील पर्यटकांची थंड हवेच्या पर्यटन स्थळांची पसंती असलेले पाचगणी महाबळेश्वर उन्हाळी हंगामाबरोबर पावसाळी हंगामासाठीही प्रसिद्ध असतो आणि अनेक वेळा गर्दीचा उच्चांक होतो. या वेळी मे महिन्यातील शनिवार – रविवारी आलेल्या सलग सुट्टय़ांमुळे पर्यटकांचा आणि गाडय़ांचा प्रचंड मोठा लोंढा या पर्यटन स्थळांवर होता. यामुळे हॉटेल व वाहतूक व्यवस्थाही कोलमडून गेली. रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली. या वाहतूक कोंडीचा फटका दस्तुरखुद्द साताऱ्याचे जिल्हाधिकारी डॉ. रामस्वामी एन. यांनाही बसला. वेण्णालेक ते महाबळेश्वर हे दोन किमीचे अंतर पार करण्यासाठी त्यांना काही तास लागले. वाहतूक नियंत्रित करताना पोलीस यंत्रणेच्याही नाकीनऊ आले. पाचगणी येथे प्रवेश कराच्या वसुलीमुळे दांडेघपर्यंत रांगा लागल्या होत्या.
या दोन दिवसात मोठय़ा संख्येने आलेल्या पर्यटकांमुळे पाचगणी महाबळेश्वर शहरासह प्रेक्षणीय स्थळांकडे जाणाऱ्या व शहरात येणाऱ्या सर्व रस्त्यांवर वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांचा भ्रमनिरास झाला. दोन-दोन तास गाडीत बसूनच काढावे लागले. त्यामुळे शहरातील वाहतूक शिस्तीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला.
 वाहतूक कोंडीत जिल्हाधिकारीही अडकले
शनिवार – रविवारच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. आपल्या परिवारासह आले होते. शनिवारी दुपारी ते पॉईंट्स पाहण्यासाठी बाहेर पडले. त्यांच्यापाठीमागे महसूलचे अधिकारी होते. केटस पाँईंटकडे जाताना अरुंद रस्त्यावर त्यांनाही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. हा अनुभव त्यांना दोन्ही दिवस आल्याने जिल्हाधिकारी तरी वाहतूक शिस्तीसाठी काही प्रयत्न करतील अशी अपेक्षा नागरिक बाळगून आहेत.