नाशिक जिल्ह्यात वाळू माफियांचा धुमाकूळ सुरू असून मनमाड येथे शुक्रवारी सकाळी वाळू वाहतूक करणाऱ्या मालमोटार चालकाकडे परवान्याची विचारणा करणाऱ्या सर्कल अधिकारी व तलाठय़ाच्या अंगावर थेट घालण्यात आली. त्यात ते दोघेही जखमी झाले. मुंबई-आग्रा महामार्गावरील घोटी टोलनाक्यावरही वाळू माफियांकडून शासनाच्या तपासणी पथकांना शिवीगाळ व धमक्या दिल्या जात असल्याने ईगतपुरी तालुका तलाठी संघाने पोलीस बंदोबस्त मिळेपर्यंत कामावर बहिष्कार टाकला आहे.गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात वाळूमाफियांचा उच्छाद वाढला आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई होत नसल्याने महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना धमकाविण्यापर्यंत त्यांची मजल गेली असताना आता त्यांनी तपासणी करणाऱ्या अधिकारी वा कर्मचाऱ्यांच्या अंगावर मालमोटार घालण्याचा धक्कादायक पवित्रा स्वीकारला आहे. शुक्रवारी सकाळी मनमाड चौफुलीवर असाच प्रकार घडला. मंडल अधिकारी परशुराम काकुळते व तलाठी इकबाल शेख हे दुचाकीवरून कार्यालयात निघाले होते. यावेळी वाळू घेऊन निघालेली मालमोटार त्यांच्या दृष्टीपथास पडली. त्यांनी मालमोटार चालकास थांबण्याचा इशारा करत परवान्याची मागणी केली. ही बाब लक्षात आल्यावर चालकाने त्यांची दुचाकी उडवून दिली. या घटनेनंतर नागरिकांनी मालमोटार चालक संतोष कोळपेला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेची माहिती समजल्यानंतर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेच्या निषेधार्थ येवला तलाठी संघाने कामकाजावर बहिष्कार टाकला. ही मालमोटार धुळे जिल्ह्यातून येवला तालुक्यात वाळू घेऊन निघाली होती, अशी माहिती पुढे आली आहे. या घटनेत जखमी झालेल्या एका कर्मचाऱ्याचा पाय मोडला असून त्यास नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.घोटी टोल नाक्यावरही वाळू माफियांकडून धमकाविण्याचे प्रकार सातत्याने घडत आहे. अनधिकृत व विनापरवाना वाहतूक होणाऱ्या वाळुची चोरी रोखण्यासाठी शासनाने या ठिकाणी नेमलेल्या तपासणी पथकास वाळूमाफियांकडून रात्रीच्यावेळी शिवीगाळ करून जिवे मारण्याच्या धमक्या देण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे पथकातील तलाठी, मंडळ अधिकारी व कर्मचारी भयभित झाले आहेत. या पथकाला पोलीस बंदोबस्त देण्यात यावा, अशी मागणी ईगतपुरी तालुका तलाठी संघाने तहसीलदारांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या बाबतचे निवेदन तहसीलदार गोविंद शिंदे यांना देण्यात आले. अवैध गौण खनिजाची चोरटी वाहतूक रोखण्यासाठी शासनाने तपासणी पथकाची नेमणूक केली आहे. घोटी टोल नाक्यावर दोन महिन्यांपासून मंडल अधिकारी, तलाठी व कोतवाल यांचे पथक तीन पाळ्यांमध्ये तपासणीची मोहीम राबविते. परंतु, रात्रीच्या वेळी काम करणाऱ्या पथकास वाळूमाफियांकडून शिवीगाळ करून, मालमोटारीखाली मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. रात्रीच्या पाळीत काम करणाऱ्या तपासणी पथकात नायब तहसीलदार दर्जाचा अधिकारी नेमावा, शासकीय वाहन उपलब्ध करून द्यावे तसेच या पथकास पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी करण्यात आली आहे. जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत या कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय तलाठी संघाने घेतला आहे.