स्वा. सावरकर यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू उलगडून दाखविण्याच्या उद्देशाने येथे आयोजित स्वा.सावरकर साहित्य संमेलनात अभिनव भारत संस्थेच्या सहकार्याने विविध माहितीने परिपूर्ण अशा दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.येथील ऊर्जा युवा प्रतिष्ठान आणि सावरकर साहित्य अभ्यास मंडळ यांच्यातर्फे १५ ते १७ मार्च या कालावधीत रौप्य महोत्सवी स्वा. सावरकर साहित्य संमेलनाचे आयोजन गंगापूर रस्त्यावरील चोपडा लॉन्समध्ये करण्यात आले आहे. संमेलनात दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. त्याचे वैशिष्टय़े म्हणजे, स्वातंत्र्य लढय़ात योगदान देणाऱ्या विविध राज्यातील क्रांतीकारकांची देण्यात येणारी सचित्र माहिती. या लढय़ात नाशिककरांनीही उत्स्फुर्त सहभाग नोंदविला असला तरी काही अज्ञात चेहरे नेहमीच पडद्याआड राहिले. १८३१ मध्ये ब्रिटीश अधिकारी जॅक्सन याची हत्या अनंत कान्हेरे यांनी कृष्णाजी कर्वे आणि विनायक देशपांडे यांच्या सहकार्याने केली होती. जॅक्सनचा वध ही ऐतिहासिक घटना असली तरी नाशिकच्या अनामिक चेहऱ्यांचा उल्लेख इतिहासात क्वचितच पहावयास मिळतो. आजच्या पिढीला या योगदानाबद्दल माहिती व्हावी, यासाठी प्रदर्शनात कर्वे, देशपांडे आणि कान्हेरे या त्रिमुतीर्ंच्या छायाचित्रांसह जॅक्सनच्या खुन खटल्याशी संबंधित काही दुर्मिळ छायाचित्रे पहावयास मिळतील.स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या साहित्यिक, क्रांतिकारक, विज्ञाननिष्ठ, समाजसुधारणांसह विविध पैलुंवर प्रकाशझोत टाकणारी येथील वासुदेव कुलकर्णी यांनी काढलेली १२ तैलचित्रे प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. कुलकर्णी यांनी सावरकरांवर उपलब्ध साहित्य आणि कल्पनाशक्तीचा आधार घेत जलरंगाच्या माध्यमातून ही चित्रे रेखाटली आहेत. त्यात सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली गेली त्यावेळेचा प्रसंग, मार्सेलच्या बंदरातून टाकलेली उडी, बेडय़ांमध्ये जखडलेले सावरकर, रोटी-बेटी प्रथेच्या विरूध्द उभे ठाकलेले सावरकर यासह विविध प्रसंगावर आधारीत चित्रांचा समावेश आहे. ही चित्रे सध्या जीर्ण अवस्थेत संस्थेत उपलब्ध असली तरी या संपुर्ण चित्राचे डिजिटलायझेशन करण्यात आले आहे. छायाचित्रांसमवेत सावरकरांच्या नाशिक शहरातील संबंधित आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येणार आहे. अभिनव भारत संस्थेच्या माध्यमातून गेली ३५ वर्षे सावरकरांच्या विविध स्मृती जपण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, या संस्थेस नाशिककरांचा फारसा प्रतिसाद लाभला नसल्याने अनेक उपक्रम बंद पडले, अशी खंत संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत रहाळकर यांनी व्यक्त केली. या पाश्र्वभूमीवर आता संमेलनाच्या माध्यमातून नाशिककरांपर्यंत पोहचण्यासाठी संस्था प्रयत्न करत असल्याचे रहाळकर यांनी सांगितले.