साईनगर या मुंबई-शिर्डी जलद गाडीचा वर्धापनदिन आज नगर रेल्वेस्थानकात मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. ६ वर्षे पूर्ण झालेल्या या गाडीला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद लाभला असून मुंबईतून शिर्डीला येणाऱ्यांबरोबरच नोकरीनिमित्त राहुरी, श्रीरामपूर, पुणतांबा, शिर्डी येथे जाणाऱ्या येणाऱ्यांनाही या गाडीचा मोठाच फायदा होत आला आहे.
काही भाविक व नोकरदारांपैकीच काहीजण एकत्र येऊन पहिल्या वर्षांपासून गाडीचा वाढदिवस नगर रेल्वेस्थानकात साजरा करत असतात. सकाळी साडेसात वाजता गाडी रेल्वेस्थानकात येताच इंजिनला फुलांच्या हारांनी सुशोभीत करण्यात आले. तिकीट तपासणीस, स्थानक प्रबंधक, तसेच गाडीच्या चालकांसह अन्य रेल्वे कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
गोवर्धन पांडुळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सर्वश्री अतिक शेख, सचिन क्षेत्रे, विजय पाटोळे, पंकज देशमुख, अरूण सोनवणे, अजय पुंड, अनिल चोभे, दीपक साळवे, आनंद शिर्के, शेख सर, सी. एल. कांबळे, जोशी, सुंबे, डावखर, सदानंद राऊत, गड्डम आदींनी यात पुढाकार घेतला होता. संदीप गावडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. हेमंत नागपुरे यांनी आभार मानले.