सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर या दिग्दर्शकद्वयींचे वेगवेगळ्या विषयांवरचे चित्रपट असतात हे सर्वश्रुत आहे. ‘संहिता’ हा आणखी एक असाच वेगळ्या विषयावरचा चित्रपट आहे. कथा-पटकथा आणि मांडण्याची शैली यामध्ये नावीन्य असलेला हा चित्रपट नेत्रसुखद आणि सुश्राव्य संगीताने नटलेला आहे. शहरी-महानगरीय प्रेक्षकाला रुचणारा, क्वचित पटणारा असा हा चित्रपट आहे. रूढार्थाने प्रेमकथा नसलेला क्वचित गुंतागुंतीचा परंतु, प्रमुख व्यक्तिरेखांच्या माध्यमातून वेगवेगळा दृष्टिकोन मांडण्यात चित्रपट यशस्वी ठरला आहे.

एकच कथा, त्याची सुरुवात आणि शेवट रुपेरी पडद्यावर मांडताना त्यातील प्रमुख व्यक्तिरेखा, त्यांचे स्वभाव, मूळ कथा लेखकाचे त्याबाबत मत,  कलावंतांचे मत, दिग्दर्शकाचे मत आणि त्यांच्यातील परस्पर देवाणघेवाण व चर्चेतून कथेचा शेवट काय करायचा, कसा करायचा हे ठरविले जाते असे दृश्य यात आहे. या कथानकाचा शेवट कसा असावा हे चित्रपटातील दृश्यातील चर्चेत दाखवितानाच प्रेक्षकांच्या मनातही नकळत त्याचा विचार केला जातो किंवा तसा तो प्रेक्षकानेही करावा असे दिग्दर्शकद्वयींना अपेक्षित असावे, असे चित्रपट पाहताना जाणवते.
हेरवाड हे खालसा झालेले एक संस्थान आहे. त्याचा राजा म्हणजेच महाराज सत्यशील, त्याची पत्नी म्हणजे महाराणी मालविका, राजाच्या दरबारात गाणारी गायिका भैरवी याविषयीची कथा रेवती साठय़े ही माहितीपट दिग्दर्शिका वाचते आणि शिरीन ही वृद्ध महिला तिला त्यावर सिनेमा बनव असे सांगते. शिरीन निर्माती आहे. कथाबीज ऐकल्यानंतर मूळ कथा लेखिका तारा देऊसकर यांची भेट रेवती घेते आणि चित्रपट करायचा तर हेरवाड संस्थानला भेट देऊन कथानक विकसित करून चित्रपट बनविता येईल असे ठरते. म्हणून तारा देऊसकर व रेवती संस्थानला भेट देतात, तिथला राजवाडा पाहतात. चित्रपटाची पटकथा किंवा संहिता लिहिण्यासाठी आवश्यक त्या गोष्टींची जुळवाजुळव रेवती करते. हे करतानाच राजा-राणी आणि गायिका यांचे परस्पर नातेसंबंध तसेच राजा-गायिका यांच्यातील प्रेम, गायिकेचे गाणे हे सारे दृश्यांमधून उलगडत जाते.
दिग्दर्शिका रेवती संहिता तयार करीत असतानाच राजा-राणी-गायिका यांच्या नातेसंबंधांबरोबरच स्वत:च्या आयुष्यातील नवरा, मित्र, बहीण यांच्याशी असलेल्या नातेसंबंधांचा विचार करते. चित्रपटातील व्यक्तिरेखा, त्यांचे स्वभाव, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांचे एकमेकांशी असलेले परस्परसंबंध या माध्यमातून नकळतपणे चित्रपट स्त्री स्वातंत्र्य, तिचे करिअर, तिच्या महत्त्वाकांक्षा, व्यक्ती म्हणून प्रत्येकाचे समाजात असलेले स्थान, नवरा-बायकोंचे प्रेम, त्यातली गुंतागुंत या सगळ्याबाबत भाष्य केले आहे.
दिग्दर्शकद्वयींनी सिनेमात सिनेमा हा प्रकार सादर केला आहे. दिग्दर्शिका संहिता लिहीत असतानाच चित्रपट उलगडत जातो हा फॉरमॅट दाखवितानाही मराठी चित्रपटात आणखी एक नवा प्रकार चित्रपटकर्त्यांनी केला आहे. तो म्हणजे महाराज सत्यशील आणि रेवतीचा खऱ्या आयुष्यातील नवरा रणवीर शिंदे तसेच रेवती साठय़े ही दिग्दर्शिका आणि चित्रपटातील संस्थानची महाराणी मालविका, मूळ कथा लेखिका तारा देऊसकर आणि संस्थानच्या राजाची आई, रेवती साठय़ेची खऱ्या आयुष्यातील बहीण आणि संस्थानच्या राजाची बहीण या सगळ्या व्यक्तिरेखांचे कलावंत दुहेरी भूमिका साकारताना दाखविले आहेत. त्यामुळे गुंतागुंत वाढते पण ते पाहताना प्रेक्षकाला मजाही येते, पण अनेकदा प्रेक्षकांचा गोंधळ उडण्याचीही शक्यता आहे.
संगीत हे या चित्रपटाचे महत्त्वाचे अंग आहे. राजाच्या दरबारातील गायिका हे मुख्य पात्र असल्यामुळे संगीत आणि आरती अंकलीकर-टिकेकर यांनी गायलेली गाणी पडद्यावर पाहताना आणि ऐकताना ‘सरदारी बेगम’ या चित्रपटाची आठवण प्रेक्षकांना होईल. सर्वच प्रमुख कलावंतांनी आपापल्या व्यक्तिरेखा उत्कृष्ट सादर केल्या आहेत.
देविका दप्तरदार यांनी साकारलेल्या महाराणी मालविका व रेवती साठय़े या दोन्ही व्यक्तिरेखा, त्यातला भेद कमालीच्या सहजतेने अभिनयातून पेलला आहे. कर्णमधुर संगीत, नेत्रसुखद छायालेखन आणि सर्वच कलावंतांचा अभिनय हे या चित्रपटाचे वैशिष्टय़ आणि सामथ्र्य आहे.  
‘संहिता’
निर्माता- सुभाष घई, दिग्दर्शक- सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर, कथा-पटकथा-संवाद- सुमित्रा भावे, छायालेखन- संजय मेमाणे, संगीत- शैलेंद्र बर्वे, संकलन- मोहित टाकळकर, कलावंत- देविका दप्तरदार, मिलिंद सोमण, राजेश्वरी सचदेव, उत्तरा बावकर, ज्योती सुभाष, डॉ. शरद भुताडिया, डॉ. शेखर कुलकर्णी, सारंग साठय़े, नेहा महाजन व अन्य.

all the best marathi natak preview loksatta ravindra pathare
नाटयरंग : ‘ऑल दि बेस्ट’ – गजब ‘त्यांची’ अदा!
Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर