आयुष्यात चांगल्या-वाईट गोष्टी येतात. त्यांचा शांतपणे विचार करून त्यावर मात करता येते. त्यातून जीवन जगण्याचा मार्ग सापडतो. म्हणजेच आनंदी जीवन जगण्यासाठी स्वत:चा आत्मविश्वास वाढविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन समुपदेशक अभय बाग यांनी केले. ‘नाएसो’च्या मा. रा. सारडा कन्या विद्या मंदीर शाळेतर्फे मातोश्री रामप्यारीबाई सारडा आणि लिलाताई ठकार यांच्या स्मृतीदिनानिमित्त माजी विद्यार्थिनींच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन परशुराम साईखेडकर नाटय़गृहात करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था उपाध्यक्ष व शाळा समिती अध्यक्ष रमेश देशमुख होते. यावेळी संस्थेचे विश्वस्त डॉ. विनय ठकार, कार्यवाह शशांक मदाने, कार्यकारी मंडळ सदस्य पां. म. अकोलकर उपस्थित होते. यावेळी बाग यांनी नेहमी सकारात्मक विचार करून तो अमलात आणावा, असे आवाहन केले. विद्यार्थिनींनी एकाग्रता वाढवून लक्षपूर्वक श्रवण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बाग यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनावर आधारित ‘मुकी झालेली घरे’ हा कार्यक्रम सादर केला. त्याव्दारे आनंदी जीवन जगण्याची कला कशी वाढवावी याविषयी मार्गदर्शन केले.संस्थेचे अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर यांनी संस्थेच्या देणगीदार रामप्यारीबाई सारडा आणि लिलाताई ठकार यांच्या कार्याप्रती आदरभाव व्यक्त केला. शाळेच्या वाटचालीत देणगीदारांबरोबरच शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे. विद्यार्थिनींनी अंगी जिज्ञासा बाळगावी आणि शिक्षकांचे मार्गदर्शन घेऊन संशोधनवृत्ती वाढवून देशाचा विकास करावा असे आवाहन त्यांनी केले. स्मृती दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या शाळेच्या नामवंत माजी विद्यार्थिनी मालतु जुनागडे, गायिका मधुवंती भाटे आयुर्वेदाचार्य डॉ. मेघा उपासनी, विनी साठे, रेडीओ जॉकी ऋचा शहा या सर्वाचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देवून गौरव करण्यात आला. सत्कारार्थीच्यावतीने ऋचा शहा, मधुवंती भाटे यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रास्तविक शाळा समिती अध्यक्ष रमेश देशमुख यांनी केले. निवेदन सुरेख सोनवणे यांनी केले. सूत्रसंचालन मनिषा देशपांडे यांनी तर आभार उपमुख्याध्यापिका आशा डावरे यांनी मानले.