पर्यावरण संवर्धनाच्या हेतूने येथील त्रिंबकलाल जयरामभाई चौहान विद्यालयात शाडू मातीपासून गणेश मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा झाली. या वेळी विद्यार्थ्यांना जलप्रदूषण टाळण्याचे आवाहन करण्यात आले.गणेशोत्सवात पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन मुख्याध्यापिका आशुमती टोणपे यांच्या हस्ते करण्यात आले. कलाशिक्षक महेंद्र झोले यांनी शाडू मातीपासून मूर्ती कशी तयार करावी हे प्रात्यक्षिकाद्वारे दाखविले. हस्तकला शिक्षक श्रीकांत सुरसे यांनीही मार्गदर्शन केले. पर्यवेक्षक सुभाष पवार यांनी शाडू मातीचे महत्त्व पटवून दिले. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून प्रदूषण कसे होते हे पटवून दिले. मुलांसोबत मुख्याध्यापिका आशुमती टोणपे, पर्यवेक्षक सुभाष पवार, राष्ट्रीय हरित सेना प्रमुख प्रदीप पाटील, प्रदीप सिंग यांनीदेखील मूर्ती तयार केल्या. हरित सेना प्रमुख पाटील यांनी गणेशोत्सवात मोठय़ा प्रमाणात ध्वनी व जलप्रदूषण होत असल्याने हा उत्सव पर्यावरणपूरक म्हणून साजरा करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. शाडू मातीपासून तयार केलेल्या मूर्तीची स्थापना केली तर प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले.