गेल्या वर्षी साखरेचे उत्पादन मोजण्यात सरकारने चूक केली. ११० ते ११५ टन साखर अधिक होती. या वर्षी राज्यात उशिरा कारखाने सुरू झाले. त्यामुळे उत्पादनात तब्बल २१ टक्क्य़ाची तूट येऊ शकेल. उत्पादन जरी घटले असले तरी साखरेचा दर मात्र दिवसेंदिवस कमी होत आहे. किमान २८ रुपये प्रतिकिलो एवढा दर साखर कारखान्यांना मिळेल, असे गृहीत धरून शेतक-यांना देण्यात आलेला भाव कसा द्यायचा, असा प्रश्न साखर उद्योगापुढे आहे. साखरेच्या दरानुसार राज्य सहकारी बँक कर्जाऊ रक्कम देत असल्याने ७०० रुपयांची तूट कर्ज आणि उत्पादनात दिसते. परिणामी, राज्यातील २५ ते ३० टक्के कारखाने पुढच्या वर्षी बंद पडतील, अशी स्थिती आहे.मराठवाडय़ात चांगला साखर कारखाना म्हणून परिचित असणा-या बहुतांशी उद्योगांसमोर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, ज्या कारखान्यांकडे आसवानी प्रकल्प नाही, त्यांची आर्थिक स्थिती तर दयनीय झाली आहे. राज्यात गेल्या वर्षी ८० लाख टन साखर उत्पादन झाले होते. या वर्षी त्यात घट होईल. २ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल साखरेचा दर राहील, असे गृहीत धरून करण्यात आलेली गणिते कोलमडली आहेत. उत्पादित केलेल्या साखरेला कारखान्याच्या स्तरावर २३ रुपये २५ पैसे असा प्रतिकिलो दर मिळत आहे. त्यामुळे ७०० ते ८०० रुपयांची तूट निर्माण होते आहे. कर्ज आणि उत्पादित साखर याच्या तुटीचा ताळमेळ बसत नसल्याने कारखानदार हैराण झाले आहेत. रांजणी येथील नॅचरल शुगर या आघाडीच्या उद्योगसमूहाचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे म्हणाले, की मागच्या ३५ वर्षांपासून मी साखर उद्योगात आहे. मात्र, आजच्या एवढी वाईट स्थिती पूर्वी नव्हती. कारखानदारी अक्षरश: ऑक्सिजनवर आहे. उस्मानाबाद, बीड, लातूर या तीन जिल्ह्य़ांत तसा तुलनेने पाऊसही कमी आहे. यातच साखरेचे दर कमी-अधिक होत असल्याने साखर उद्योग अडचणीत आहे.