विहीतगाव येथे पुलावरील कथडय़ाला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात दोन जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. जखमीची प्रकृती  प्रकृती चिंताजनक आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज आहे. विल्होळी येथे राहणारे लखन सुरेश वाघ, संदीप पांडुरंग बेंडकुळे आणि उमेश अशोक जाधव हे तिघे मित्र मोलमजुरी करतात. गुरूवारी रात्री उशिराने ते हिरो होंडा मोटारसायकलवरून देवळाली कॅम्पहून नाशिकरोड येथे मित्राकडे जाण्यास निघाले होते. त्यांची दुचाकी विहितगांव पुलाजवळील स्मशानभूमीजवळ आली असता लखन वाघचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी पुलाच्या संरक्षक कठडय़ाला आदळली. त्यात लखन जागीच ठार झाला तर त्यात संदीप व उमेश नदीपात्रात फेकले गेले. संदीपला डोक्याला जबर मार बसल्याने त्याचाही मृत्यू झाला. तसेच उमेश गंभीररित्या जखमी असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. नाशिकरोड पोलीस स्थानकात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.