मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागल्याने उरण शहरात खरेदीसाठी झुंबड उडाली असून बाजारपेठाही पावसाळ्यापूर्वीच्या खरेदीसाठी सजल्या असताना उरण तालुक्यात भारनियमन नाही, असे सांगणाऱ्या महावितरण कंपनीकडून सहा सहा तासांचे भारनियमन होत असल्याने उरण नागरिक तसेच व्यापारीही त्रस्त झालेले आहेत. यामुळे व्यवसायावर परिणाम होत असल्याचे मत व्यापाऱ्यांकडून व्यक्त केले जात आहे.
बुधवारी वटपौर्णिमेच्या निमित्ताने ग्राहकांनी उरण शहरात खरेदीसाठी प्रचंड गर्दी केलेली होती. याच वेळी नेमकी उरण शहरातील वीज गायब झाल्याने आधीच उकाडय़ाने हैराण झालेल्या जनतेला वीज गायब झाल्याचा त्रास सहन करावा लागत होता. दुपारी गायब झालेली वीज तब्बल सहा तासांनी रात्री ८ वाजताची सुमारास आली. दररोज सकाळी एक ते दोन तास, दुपारी एक तास व सायंकाळी असा विजेचा खेळखंडोबा दररोज सुरू असतो. अशाच प्रकारची स्थिती राहिल्यास पावसाळय़ात नागरिकांना अधिक त्रास सहन करावा लागण्याची शंका व्यक्त केली जात आहे. या संदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता पावसापूर्वीची कामे सुरू असल्याने झाडे तोडण्याची कामे सुरू असल्याने वीज गेल्याचे सांगितले.