बनावट खरेदीखत तयार करून सुमारे १४ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील शरणपूर रोड येथे राहणारे संजू रघुनाथ नवाल यांनी याबाबत तक्रार दिली. भुसावळ येथील रमेश रोडेकर, अरविंद पाटील, जळगाव येथील विलास एन. करवा यांना जमीन व्यवहारापोटी १७ जुलै २०१२ ते आजपर्यंत नाशिक व जळगाव येथे १४ लाख २९ हजार ६०२ रुपये दिले होते. संशयितांची वरणगाव येथील शेती साठेखत करून १७ लाख ३० हजार ६०२ रुपयांना निश्चित झाली. त्यासाठी नवाल यांनी संशयितांना ही रक्कम दिली होती. वेळोवेळी संशयितांना खरेदी खत करण्याबाबत विचारले असता संशयितांनी उडवाउडवी करत अखेर नकार दिला. नवाल यांच्याकडून जमिनीचे पैसे घेऊन खरेदीखत करून न देता त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.