येत्या दोन दिवसांत अण्णा हजारे यांचे उपोषण संपले नाहीतर तर अण्णांच्या मूत्रपिंडास गंभीर स्वरूपाचा धोका निर्माण होऊ शकतो असा अहवाल डॉक्टरांनी दिल्याची माहीती माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी सोमवारी सायंकाळी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, हजारे यांचा कोणीही गैरसमज करीत नसल्याचा खुलासाही त्यांनी केला. दरम्यान, सात दिवस उपोषण करणा-या देशभरातील कार्यकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेण्याचे आवाहन हजारे यांना सायंकाळी केले.
हजारे यांची प्रकृती  खालावत चालल्याचा डॉक्टरांचा अहवाल आहे, अण्णा कितीही म्हणत असले, की माझी प्रकृती ठीक आहे तरी वैद्यकीय अहवालाप्रमाणे ते दोन दिवसांनंतर उपोषणास बसू शकतील की नाही याविषयी शंका आहे. त्यासाठी हे विधेयक बुधवारपर्यंत दोन्ही सभागृहांत मंजूर करावे, तसे झाले तर बुधवारी सायंकाळपर्यंत अण्णांचे उपोषण मागे घेता येईल. बुधवापर्यंत हजारे यांच्या प्रकृतीस धोका नाही, असेही त्या म्हणाल्या.
‘मी दिल्लीस निघाले होते, पण अण्णांची तब्येत खालावली असल्याचा निरोप आल्यानंतर राळेगणसिद्धीकडे परतले’ असे त्यांनी सांगितले.
    ‘अण्णांचा कोणी गैरसमज करीत नाही. सरकारने सादर केलेल्या मसुद्याचे आम्ही पत्रकारांना पुरावे सादर केले आहेत. स्थायी समितीचा अहवाल गेल्या वर्षभरापासून संकेतस्थळावर उपलब्ध असून गेल्या अनेक दिवसांपासून हा अहवाल वाचला जात आहे. हा अहवाल सार्वजनिक आहे. त्याची अण्णांनाही कल्पना आहे. सर्व निर्णय अण्णांनीच घेतले आहेत’ असेही त्या म्हणाल्या
    आम्ही केजरीवाल यांचे हित पाहणारेच आहोत. ते यशस्वी व्हावेत ही आमची इच्छा आहे. त्यांनी चळवळीत सहभागी व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Great risk to anna if you do not end hunger strike in two days kiran bedi
First published on: 17-12-2013 at 02:12 IST