तुझ्या वडिलांना कोणी मारले? कोणी आले होते का?, असे तीन वर्षांच्या फरहानला पोलिसांनी विचारले अन् तो निरागसपणे उत्तरला .. कोणीही नाही.. मात्र फरहानचे हे उत्तर पोलिसांना हत्या प्रकरणाची उकल करण्यासाठी उपयोगी ठरले. या प्रकरणात पोलिसांनी पतीला त्याच्या दोन मित्रांसह अटक केली. मित्राच्या मदतीने गाडीमध्ये पत्नीची हत्या करून चोरांनी हत्या केल्याचा बनाव रचल्याचे स्पष्ट झाले.
वांद्रे रेक्लेमेशन परिसरात रात्री बाराच्या सुमारास एका इंडिगो गाडीत महिला मृतावस्थेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस घटनास्थळावर गेल्यानंतर गाडीत आयेशा शेख ही महिला मृतावस्थेत होती तर शेजारी तिचा पती सलमान शेख (२८) हा हातपाय बांधलेल्या अवस्थेत होता. त्यांची फरहान (३) आणि ९ महिन्यांचा फरझान ही मुले सुद्धा सोबत होती. पत्नीसोबत फिरायला जात असताना वाटेत चौघांनी अडवून लूट केली आणि आयेशाची हत्या केली, असे त्याने पोलिसांनी सांगितले. मात्र पोलिसांनी फरहानला विश्वासात घेतल्यानंतरच हा बनाव उघड झाला.
आरोपी सलमान याचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. त्याला आयेशाचा विरोध होता. त्यामुळेच आयेशाचा काटा काढण्यासाठी त्याने मित्राला १० हजार रुपयांची सुपारी दिली. ठरलेल्या योजनेप्रमाणे सलमान आपल्या पत्नी आणि मुलांना फिरण्यासाठी भावाच्या इंडिका गाडीतून घेऊन निघाला. रेक्लमेशन येथे त्याचा मित्र गाडीत चढला. त्या दोघांनी मिळून आयेशाची ओढणीने गळा आवळून हत्या केली आणि सलमानवरही हल्ला झाल्याचे भासवण्यासाठी त्याला किरकोळ जखमा केल्या. त्यावेळी सलमानचा दुसरा मित्र त्यांच्या मुलांना बाहेर नेऊन खेळवत होता. आयेशाची हत्या केल्यानंतर त्याने दोघांचे हातपाय बांधले आणि घरच्यांनाही फोन करून कळवले. वांद्रे पोलिसांनी याप्रकरणी सलमान शेख, त्याचा मित्र मोहम्मद सादीक (२१) आणि साकीर गुलाम (२३)या दोघांना अटक केली आहे. विशेष म्हणजे सलमानच्या भावानेच पोलिसांना या दोन आरोपींना पकडण्यासाठी मदत केली. सलमान पूर्वी कॉल सेंटरमध्ये काम करत होता.
सध्या तो सेल्ममनची नोकरी करीत होता. सलमान आणि आयेशाचे ४ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. सलमानचे एका तरुणीशी विवाहबा’ा संबंध होते. त्यांनी लग्नही केले होते. त्याला आयेशा अडथळा ठरत होती. दहा दिवसांपुर्वी त्याने हा हत्येचा कट रचला होता, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली.