रोजगार हमी योजनेची कामे ग्रामपंचायतमार्फत करून न घेता ती स्वतंत्र यंत्रणेमार्फत व्हावीत, तसेच ग्रामसेवकास स्वतंत्र वेतनश्रेणी मिळावी, अशा विविध सात मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्यावतीने मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्हा परिषदेसमोर ग्रामसेवकांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे संघटनेचे अध्यक्ष एल. जी. गायकवाड यांनी सांगितले.
२० ग्रामपंचायतींमागे एक विस्तार अधिकारी असे पद निर्माण व्हावे, पंचायत समिती स्तरावर सहायक गटविकास अधिकारी हे पद ग्रामसेवक संवर्गातून पदोन्नतीने भरावे, पाच हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या गावांमध्ये सहायक कर्मचारी उपलब्ध करून द्यावा, आदर्श काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला ४ टक्क्य़ांप्रमाणे वेतनवाढ मिळावी, तसेच परीक्षा व निवडणुकीच्या कामात ग्रामसेवकांना गुंतवू नये, अशा मागण्या करण्यात आल्या. हिंगोली- विविध मागण्यांसाठी  १ डिसेंबरपासून ग्रामसेवक युनियनच्या वतीने काम बंद आंदोलन चालू आहे. जि. प. समोर ग्रामसेवकांनी आज धरणे आंदोलन करून मागण्यांचे निवेदन दिले. या आंदोलनात मोठय़ा संख्येने ग्रामसेवक सहभागी झाले होते. बीड- गावपातळीवर काम करताना रोहयोमार्फत केली जाणारी कामे काही वेळा नियमबाह्य़ असतात. त्यामुळे पुढारी ग्रामसेवकांवर दबाव टाकतात. त्यामुळे रोहयोची कामे ग्रामसेवकांकडे देऊ नयेत, या मागणीसाठी जि. प. कार्यालयासमोर मंगळवारी ग्रामसेवकांनी आंदोलन केले.