दसऱ्याचं सोनं लुटायला अजून दहा दिवस आहेत. त्यामुळे, बाजारात जाऊन, पसे खर्च करून आणलेल्या पानांना सोनं म्हणून, ते लुटून कचरा करण्यापेक्षा, आपटय़ाचं झाड लावून सीमोल्लंघनाचा विचार करायला यंदा हरकत नाही.

जगभर ‘कम सप्टेंबर’ झालं की पुन्हा एकदा आसमंतात व्हायला लागलेले बदल ठळकपणे नजरेत भरायला लागतात. आपल्याकडे शरदाच्या चांदण्यांमुळे प्रसिद्ध झालेला शरद ऋतू याच काळात मनामनात रुंजी घालतो. पावसाने सुखावलेला आणि स्थिरावलेला निसर्ग हिरवाईने संपन्न होऊन आनंदलेला दिसतो. पितृपंधरवडा संपला की लगेचच आदिशक्तीचा जागर सुरू होतो आणि शारदीय नवरात्रात घट बसतात. नवरात्र हा आदिमायेला वंदन करण्याचा काळ. या नऊ दिवसांत वातावरण अगदी झेंडूमय होऊन जातं. झेंडू हा आपल्या सण समारंभांचा इतका अविभाज्य घटक आहे की कुठलेही मंगलकार्य या फुलांखेरीज पूर्णत्वाला जात नाही.

मारी गोल्ड ऊर्फ गेंदा ऊर्फ झेंडू म्हणून ओळखले जाणारे हे फूल जगभर आढळणाऱ्या सूर्यफुलाच्या कुळातलं ‘टागेटस’ प्रजातीत तब्बल अठ्ठावन्न प्रकारांमध्ये उमलतं. मेक्सिको आणि दक्षिण अमेरिकेतलं स्थानिक फूल त्याच्या चित्ताकर्षक केशरी आणि पिवळ्या रंगांमुळे जगभर उद्यानात लावायला नेलं गेलं नि अगदी स्थानिक होऊन गेलं. कुठेही सहज रुजणारं आणि फुलणारं झेंडू नगदी पीक म्हणून भारतात सहज स्थिरावलं गेलंय. आपल्याला माहीत असलेलं झेंडू कमरेपर्यंत म्हणजेच दीड-दोन फुटापर्यंत वाढतं. पण या झेंडूची आफ्रिकन किंवा अमेरिकन जाती चक्क पाच फुटांपर्यंत वाढतात. आपल्याला जास्त करून धार्मिक व मंगलकार्यासाठीच माहीत असलेल्या या फुलाचे अनेक इतर उपयोग आहेत. नसíगक रंग बनवणारे, हाताने कागद बनवणारे या फुलांचा, पानांचा वापर रंग बनवायला, कागद बनवायला तर करतातच पण त्याच जोडीला जगभर विविध ठिकाणी या झेंडूचा वापर विविध रोगांवर औषध म्हणूनही केला जातो. झेंडू म्हणजे निव्वळ उत्सव असच समीकरण बनवलं गेल्याने चहा बनवून, उत्साहवर्धक पेय बनवून झेंडूला स्वाहा केलं जातं हे आपल्या गावी कुठे असतं? आपण अलीकडे या फुलांना खतप्रकल्पात घालून उत्तम खत बनवायला लागलोय. बाकी अनेक उपयोग आपल्या खिजगणतीतही नाही. नेपाळमध्ये शतपत्री या नावाने ओळखल्या जाणाऱ्या झेंडूबद्दल या नवरात्रात अधिक माहिती करुन घ्यायला हरकत नाही.

देवीसमोरच्या घटातल्या झेंडू फुलांची माळसंख्या वाढायला लागल्यावर वेध लागतात ते विजयादशमी, अर्थात दसऱ्याचे. साडेतीन मुहूर्तापैकी एक समजला जाणारा दसरा सण हसरा असं म्हटल जातं. सीमोल्लंघन करायचं आणि सोनं लुटायचं अशी पूर्वापार चालत आलेली आपली परंपरा. ही परंपरा पाळताना गेल्या काही वर्षांत बाजारात नवमीला ढिगाने विकली जाणारी आपटय़ाची पानं विकत आणून एकमेकांना दिली जातात. दसऱ्याला शुभेच्छा म्हणून दिलेलं हे सोनं, दुसऱ्या दिवशी कचऱ्यात फेकलेलं दिसून येतं. सोनं का लुटायचं, हा विचार करताना, सोनं म्हणून लुटलेल्या, ओरबाडलेल्या त्या झाडाची माहितीच कुणी करून घेत नाही. खूप गुण असणारं साधंसं दिसणारं हे सोन्याचं झाड म्हणजे आपटा अगदी शुद्ध भारतीय आहे. सिसालपेनिसी कुळातलं हे झाड ‘बाउहिनिया रेसिमोसा’ या वनस्पतिशास्त्रीय नावाने ओळखलं जातं. यातलं याच्या प्रजातीचं ‘बाउहिनिया’ हे नाव सोळाव्या शतकातल्या ‘जॉन आणि कास्पर बॉहिन’ या जुळ्या वनस्पतिशास्त्रज्ञांच्या नावावरून ठेवण्यात आलंय. यातल ‘रेसिमोसा’ म्हणजे ‘एक विशिष्ट प्रकारे तुरा येणारी फुलं.’ या फुलांची गंमत म्हणजे सगळी फुलं फांद्यांच्या टोकांना येतात. साधारण पाच मीटर्सची उंची गाठणारं हे मध्यम आकाराचं झाड अगदी वेडवाकडं वाढतं.

मार्च ते जून या काळात आपटय़ाच्या झाडाला हिरवट पिवळट छटेची पांढरी फुलं येतात. बहर ओसरला की पावसाळ्यात हे झाड चेहऱ्यावर शेंगांची उद्गारचिन्ह मिरवायला सुरुवात करतं. या शेंगा चपटय़ा असतात नि वाळल्यावर कुरकुरीत कडक होतात. प्रत्येक शेंगेत साधारण चौदा-पंधरा चपटय़ा लहान बिया असतात. या शेंगा पुढच्या उन्हाळ्यात सुकतात नि खाली गळून बियांचा बिछाना अंथरतात. या बिया लगेच रुजून भरपूर नवीन रोपं बनतात. ही कुठेही उगवणारी बाळ रोपं नंतर नीट वाढली तर उत्तम पानझडी प्रकाराची झाड बनतात.

आपटय़ाच्या झाडाचे उपयोग लिहायचे म्हटले तर अनेक आहेत. याच्या लाकडात उत्तम उष्मांक असल्याने वाळलेल्या फांद्यांचा उपयोग उत्तम सरपण म्हणून होतो. याचं लाकूड तर उत्तम कठीण नि टिकाऊ म्हणूनच प्रसिद्ध आहे, पण झाडं वेडीवाकडी वाढत असल्याने त्याचा उपयोग मोठय़ा कामासाठी न होता जास्तीत जास्त शेतीच्या अवजारांसाठी केला जातो. या झाडाची साल बऱ्यापकी चिवट असते. तिची मजबूत दोरी बनते. हजारो वर्षांपासून आयुर्वेदाला याचे औषधी गुणधर्म परिचीत आहेत. मात्र हल्ली इन्स्टंटच्या जमान्यात आपण ते विसरायला लागलोय. आपल्याकडे दसऱ्याला सोनं लुटण्याच्या नावाखाली याची अमाप कत्तल होते. आपटय़ाच्या जोडीला त्याच्याशी साम्य बाळगणारं कांचनचं झाडही अज्ञानाने बेसुमार तोडलं जातं. आपटा काय किंवा कांचन काय, कसेही कुठेही वाढतात. कोणत्याही प्रकारची जमीन त्यांना रुजायला चालते. कमी पाणी चालतं. अगदी रेताड, ओसाड जमिनीतपण ही देखणी झाडं रुजतात नि हळूहळू फुलतात. सगळ्यात मोठा फायदा म्हणजे ही झाडं जमिनीचा कस वाढवतात. संस्कृतमध्ये आपटय़ाला ‘अश्मनतक’ म्हणजेच दगडाचा नाश करणारा असं म्हणतात. याची मुळं दगडाच्या फटीतून आत जाऊन त्याला फोडतात. पूर्वी गावाबाहेर वाढणारी ही झाडं हळूहळू आपल्या जीवनातूनच जणू हद्दपार व्हायला लागली आहेत. एकीकडे सोनं म्हणून लुटायचं नि दुसऱ्या दिवशी कचऱ्यात फेकायचं असं करण्याऐवजी यावर्षी एकमेकांना आपटय़ाची रोपं अथवा बिया द्यायला हरकत नाही.

या सोनं लुटण्यासोबत लोप पावत चाललेली प्रथा म्हणजे शमी वृक्षाचे पूजन. गणपतीच्या पूजेत अत्यावश्यक समजली जाणारी पत्री अंगोपांगी बाळगणारा. तोच तो, पांडवांना अज्ञातवासात त्यांची शस्त्रास्त्र लपवायला आपली ढोली देणारा वृक्ष! मायमोसेसी कुळातलं हे झाड अनेकांना माहीत असतं पण प्रत्यक्षात ते कसं दिसतं हेच पाहिलेलं नसतं. राजस्थानातल्या बिश्नोई जमातीला परमपूज्य असणारा खेजडी वृक्ष म्हणजेच आपला शमी. ‘प्रोसोपिस सिनेरारिया’ असं गमतीदार वनस्पतिशास्त्रीय नाव मिरवणारा शमी पूर्ण वाढल्यावर मजबूत वृक्ष बनतो आणि सहज वीसेक मिटर्सची उंची गाठतो. अगदी शतप्रतिशत देशी असलेला शमी कोरडय़ा, शुष्क वातावरणात उत्तम वाढतो. हळूहळू वाढणारा हा वृक्ष वसंतात फुलतो आणि अंगभर लहान लहान पिवळट फुलबाज्या मिरवतो. या फुलांना एक मंद वास असतो. उन्हाळ्यात याला पिवळट रंगाच्या दहा ते वीस सेंमी आकाराच्या शेंगा लागतात. या शेंगा वेडय़ावाकडय़ा असतात. आपल्या पिठूळ गरात साधारण पंचवीस ते तीस बिया या शेंगा बाळगतात. या बियांमधून सहज नवीन झाडं रुजतात. शमीचं लाकूड कठीण असतं. शेतीची अवजारं, बलगाडय़ा, ओढगाडय़ा, होडय़ा बनवायला ते उपयुक्त ठरतं. या झाडाची साल राजस्थानात नियमित पीठ करून भाकरीत मिसळून दैनंदिन खाण्यात वापरली जाते. जनावरांना उत्तम खाद्य म्हणून याची पानं, डहाळ्या आणि शेंगा वापरात आणल्या जातात. खेजडीच्या शेंगांची भाजी ही राजस्थानातली अतिशय लोकप्रिय पाककृती आहे. शमीचं झाडं जमिनीचा पोत आपल्या मुळांद्वारे सुधारायला मदत करत असल्याने, रेताड जमिनीत हल्ली यांची विशेष लागवड करण्यात येते. आयुर्वेदाला तर याचे ढिगाने उपयोग माहीत आहे. असा बहुगुणी साधा वृक्ष धार्मिक संरक्षण मिळाल्यास जोमाने तगू शकतो असाच काहीसा विचार पूर्वी केला गेला असेल नि पूजला गेला असेल असा विचार मनात आल्याखेरीज राहात नाही. शमीच्या झाडाबद्दल सांगायची गंमत म्हणजे अनेक भारतीय भाषांमधून याला नावं आहेत. फक्त इंग्रजी भाषेत या वृक्षाला नाव नाहीये.

या सगळ्या सांस्कृतिक घडामोडींबरोबर, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात दरवर्षी होणारी घडामोड म्हणजे वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो. वन्यजीव सप्ताह का साजरा केला जातो? या प्रश्नाचं उत्तर बहुतेकांना समाधानकारकरीत्या देता येत नाही. भारतातील संपन्न अशी जैविक वैविधता जपण्यासाठी शासकीय पातळीवर विविध प्रयत्न केले जात असतात. झपाटय़ाने नामषेश होणाऱ्या प्राण्यांच्या काही प्रजाती वाचवण्यासाठी १९५२ साली दोन ते आठ ऑक्टोबर वन्यजीव सप्ताह म्हणून साजरा करायला सुरुवात केली. भारतीय जीवनशैली, तिच्याशी घनिष्ट जोडलेली वन्य संपदा संवर्धन व संरक्षणासाठी सर्वसामान्य लोकांचा सहभाग आवश्यक आहे हे लक्षात आल्यावर स्लाइड शोज, निसर्गभ्रमण, पक्षी निरीक्षण, चर्चासत्रं असे वेगवेगळे जनसहभागाचे कार्यक्रम दोन ते आठ ऑक्टोबर या काळात घ्यायला सुरुवात झाली. आता ऑक्टोबरच का, हा प्रश्न कुणालाही पडू शकतो. जूनचा मध्य ते सप्टेंबरअखेर हा कालावधी आपल्या देशात पावसाचा काळ समजला जातो. या तीन महिन्यांत भारतातील सर्व राष्ट्रीय उद्यानं व अभयारण्य सामान्य जनतेच्या प्रवेशासाठी बंद असतात. सर्वत्र मुबलक खाद्य व पाणी उपलब्ध असल्याने, बहुतांश वन्यजीव सृष्टी प्रजोत्पादनात सक्रीय असते. याच दरम्यान, जंगलातील पाणसाठे वाढून वनसंपदा तरारून वर्षांच्या पुढील काळाची बेगमी आसमंत करून ठेवतो. अशा महत्त्वाच्या काळात, मानवी हस्तक्षेप पुनíनर्मितीच्या साखळीला हानीकारक ठरू शकतो. म्हणूनच हे तीन महिने, उद्याने अभयारण्ये पर्यटनासाठी व वनोपज गोळा करण्यासाठी पूर्ण बंद असतात.

हा तीन महिन्यांचा काळ, गांधी जयंतीच्या सुमारास संपतो व पर्यटनासाठी जंगलांमध्ये मानवी वावर सुरू होतो. या जंगलांमध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना स्थानिक वन्यजीव संपदेची ओळख नव्याने करून दिली जाते. ही वन्यजीव संपदा संरक्षणासाठी आपल्या देशात विविध कायदे बनवले गेले. १९७२ साली, वन्यजीव कायद्याची निर्मिती करून देशातील वन्यजीव संपदेचे वर्गीकरण करण्यात आले. नामशेष होऊ घातलेल्या जीवांना संरक्षण देऊन त्यांचे संवर्धन करण्याचे कार्यक्रम जनसहभागातून करायला सुरुवात झाली. वनात रहाणाऱ्या सजीवांचं अस्तित्व, महत्त्व अधोरेखित करणारा सप्ताह म्हणजे वन्यजीव सप्ताह अशी साधीशी व्याख्या आपण आपल्या माहितीसाठी करू शकतो. हल्ली शहरांमध्ये, सरकारी पातळीवर अनेक कार्यक्रम या सप्ताहासाठी आयोजित केले जातात. विविध संस्था, या दरम्यान निसर्गभ्रमंती, पक्षी निरीक्षणं, वन्यजीवसंपदेवर आधारित चित्रपट महोत्सव, चर्चासत्र यासारखे कार्यक्रम आयोजित करत असतात. जिथे सहभागी होणे शक्य असेल तिथे आपला सहभाग नोंदवून काहीतरी नवीन जाणून घ्यायला हरकत नसते. आपल्या परिसरात असलेली एखादी टेकडी, तलाव, दलदलीची जागा, ओहोळ, खाडी यासारखा पाणवठा नियमित निरखत राहिला तरी तिथे होणारे बदल, नांदणारे जीव, येणारे पाहुणे जाणवायला लागते. यातूनच या जीवांबद्दल, पाहुण्यांबद्दल माहिती करून घेतली की पुढची पायरी म्हणजे ते जीव वन्यजीव कायद्याच्या कुठल्या कक्षात येतात, कशा प्रकारे त्यांना संरक्षण दिलं गेलंय हे शोधायची सुरुवात होते. ही पायरी ओलांडली की, या जीवांचं अस्तित्व आणि त्या अस्तित्वाशी जोडला गेलेला परिसर वाचवण्याचं काम सुरू करायची इच्छा होते. हजारोंमधून मूठभर लोकांना अशी इच्छा झाली तरी बदलाला सुरुवात होते. आज आसमंती गप्पांमध्ये कुठल्याही प्राण्याबद्दल बोलायचं नाही असं मी ठरवलंय. वन्यजीव म्हणजे निव्वळ वाघ, सिंह, हत्ती, बिबळे, हरीण एवढंच नसून परिसरात नांदणारा अगदी किडामुंगीसारखा जीवही वन्यजीव कायद्याद्वारे संरक्षित केला गेलाय. हिरव्यागर्द झाडोऱ्यातून गळून पडलेल्या वाळक्या पानाखाली नांदणारे किडेमकोडे खाऊन जगणाऱ्या सजीवांना भक्ष्य बनवणारे मोठे जीव आज वाढत्या शहरीकरणाचे बळी ठरत आहेत. ही एकमेकांवर आधारित सूक्ष्म अन्नसाखळी अशा कार्यक्रमात जाणवते व ती जपण्याची इच्छा मनात निर्माण होते.

अर्थात, वन्यजीव सप्ताह असो की अमुक एक दिवस, निसर्गाला सगळे दिवस सारखेच असतात. एखादा ठरावीक दिवस साजरा आणि उरलेल्या दिवसांत उलटा माजरा असा प्रकार निसर्ग कधीच करत नाही. निसर्गात जी गोष्ट हत्तीला मिळते, तीच गोष्ट मुंगीलाही मिळते. ज्या गोष्टींवर हरणं जगतात, त्याच गोष्टींवर वाघ तगतात. जिथल्या झाडांवर माकडं वावरतात, त्याच झाडांवर पक्षीही विसावतात. कुणी उणं नसतं की अकाली जाणं नसतं. या साखळीतली एखादी कडी जरी तुटली तरी अन्नसाखळी विस्कळीत होते. म्हणूनच प्रत्येकाला जपणं तितकंच गरजेच असतं. पर्यटनाचा, निसर्ग निरीक्षणाचा नवीन हंगाम दोन तारखेपासून सुरू होतोय. अशा भ्रमंतीसाठी जंगलात गेल्यावर कायम लक्षात ठेवायचं ते म्हणजे, ‘चालत चालत जंगल बघायचं नाही तर जंगल बघत बघत चालायचं, फांदीवरल्या पक्ष्यासाठी अख्खं जंगलच राखायचं’. घटस्थापनेच्या आणि वन्यजीव सप्ताहाच्या खूप खूप शुभेच्छा. दसऱ्याचं सोनं लुटायला अजून दहा दिवस आहेत. त्यामुळे बाजारात जाऊन, पसे खर्च करून आणलेल्या पानांना सोनं म्हणून, ते लुटून कचरा करण्यापेक्षा, आपटय़ाचं झाड लावून सीमोल्लंघनाचा विचार करायला यंदा हरकत नाही. कोण जाणो, दसऱ्यासाठी लावलेलं हे इटुकलं झाड कुणा पाखराला घर बांधायला आश्वस्त करेल नि तोडातोडीच्या अनिष्ट रूढीपासून खरं सीमोल्लंघन होईल.
रुपाली पारखे-देशिंगकर – response.lokprabha@expressindia.com