मुंबईतील निवडणूक निकालांचे कल शिवसेनेकडे झुकू लागल्यामुळे ‘मातोश्री’वर सकाळपासून जमलेली कार्यकर्त्यांची गर्दी शिवसेना आणि भाजपने जिंकलेल्या जागांतील अंतर कमी होऊ लागताच विरली. सकाळी ढोल-ताशे आणि फटाक्यांच्या आवाजाने गजबजलेल्या कलानगर परिसरात दुपारनंतर शुकशुकाट पसरला. निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जोरदार कलगीतुरा रंगला होता. त्यामुळे मुंबईच्या निकालाबाबतची उत्सुकता फारच ताणली गेली होती. सकाळी शिवसेनेच्या बाजूने कल येऊ लागल्यावर ‘मातोश्री’ आणि ‘कलानगर’ परिसरात जल्लोष सुरू झाला. जमलेले कार्यकर्ते आणि शिवसैनिकांच्या उत्साहाला पारावार राहिला नव्हता. शिवसेना नेते विनायक राऊत, आदेश बांदेकर आदी मंडळी वाहिन्यांना ‘बाईट’ देत होते. ‘अफजलखान येवो, मोदी येवो किंवा फडणवीस येवो. शिवसेनेच्या विरोधात जो कोणी समोर येईल त्याला आम्ही धूळ चारल्याशिवाय राहणार नाही,’ असे त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले. शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांनीही टाळ्या आणि घोषणांच्या निनादात त्यांना दाद दिली. सुभाष गावडे या चित्रकार शिवसैनिकाने सर्वाचे लक्ष वेधून घेतले. त्याने शिवसेनेसंदर्भात आणि उद्धव ठाकरे यांची काढलेली चित्रे लक्षवेधी होती. महापालिका मुख्यालयाच्या वास्तूवर उद्धव ठाकरे एक पाय रोवून उभे आहेत, दुसऱ्या पायाखाली अन्य राजकीय पक्षांची निवडणूक चिन्हे त्यांनी चिरडून टाकली आहेत, असे चित्र त्यांनी साकारले होते. दुपारनंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी तिथे पोहोचले. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांनाही गराडा घातला. ‘युतीचे राजकारण या पुढे करणार नाही, मात्र अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच घेतील,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. दुपारनंतर शिवसेना आणि भाजपने जिंकलेल्या जागांतील अंतर कमी होत चालल्याच्या बातम्या येऊ लागल्या. २०-२५ जागांचे अंतर अवघ्या दोन ते चार जागांपर्यंत घटले आणि त्याबरोबर शिवसैनिकांचा उत्साहही ओसरू लागला. कार्यकर्ते हळूहूळ पांगायला सुरुवात झाली आणि नंतर परिसरात शुकशुकाट पसरला. फटाक्यांमुळे झाडाला आग कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या भरात फोडलेल्या फटाक्यांच्या माळांमुळे ‘कलानगर’च्या प्रवेशद्वाराजवळील नारळाच्या झाडाच्या फांदीने पेट घेतला. आजूबाजूच्या रहिवाशांनी पाणी ओतून आग विझविण्याचा प्रयत्न केला. शेवटी अग्निशमन दलाच्या गाडय़ा घटनास्थळी दाखल झाल्या. काही वेळातच आग विझविण्यात आली आणि मोठी दुर्घटना टळली.