सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देत तिहेरी तलाक असंवैधानिक असल्याचे म्हटले आहे. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने तीन विरुद्ध एक अशा बहुमताने अनेक शतकांपासून चालत आलेल्या तिहेरी तलाकविरोधात निकाल दिला. तिहेरी तलाकमुळे घटनेतील १४ व्या कलमाचा भंग होत असल्याचे खंडपीठाने म्हटले. तिहेरी तलाकविरोधात शायरा बानो या मुस्लिम महिलेने याचिका दाखल केली होती. बानो यांना त्यांच्या पतीने पोस्टाने तलाक दिला होता. बानो यांच्या याचिकेमुळे अनेक मुस्लिम महिलांनी तिहेरी तलाकविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली. अखेर आजचा दिवस मुस्लिम महिलांसाठी एक नवी आशा, नवी उमेद घेऊन आला. शायरा बानो उत्तराखंडमधील काशीपूरच्या रहिवासी आहेत. शायरा २००२ मध्ये अलाहाबादमधील रिजवान अहमद यांच्यासोबत विवाह बंधनात अडकल्या. शायरा यांना दोन मुले आहेत. सासरच्या व्यक्तींकडून अतिशय त्रास दिला जात असल्याची शायरांची तक्रार होती. याशिवाय हुंड्यासाठी पतीकडून छळ केला जात असल्याची, मारहाण होत असल्याची तक्रारही त्यांनी केली होती. या सर्व त्रासामुळे त्या आजारी होत्या. यानंतर रिजवान यांनी शायरा यांना जबरदस्तीने काशीपूरला, त्यांच्या वडिलांच्या घरी पाठवले. यानंतर रिजवान यांनी २०१५ मध्ये पोस्टाने बानो यांना तलाक दिला. याविरोधात शायरा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. शायरा यांच्या याचिकेमुळे मुस्लिम पर्सनल लॉ अॅप्लिकेशन कायदा १९३७ मधील कलम क्रमांक दोनलादेखील आव्हान देण्यात आले. याच कलमाच्या आधारे मुस्लिमांना बहुपत्नीत्व, तिहेरी तलाक आणि निकाह हलाला यासारख्या परंपरांचे पालन करण्याचा अधिकार मिळतो. या याचिकेत सौदी अरेबिया, पाकिस्तान आणि अन्य मुस्लिम देशांमध्ये तिहेरी तलाकवर बंदी असल्याचादेखील उल्लेख होता. भारतासारख्या प्रगत देशात तिहेरी तलाकची आवश्यकता नसून त्यावर बंदी घातली जावी, असेदेखील बानो यांनी याचिकेत नमूद केले होते. सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिल्यावर शायरा बानो यांनी त्याबद्दल आनंद व्यक्त केला. सरकारने याबद्दल लवकरात लवकर कायदा करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 'मी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत करते. आजचा दिवस मुस्लिम महिलांसाठी अतिशय ऐतिहासिक आहे. मुस्लिम समाजातील महिलांची स्थिती समजून घेऊन या निर्णयाचा सर्वांनी आदर करायला हवा,' अशा शब्दांमध्ये बानो यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.