आत्महत्येच्या जरा आधी झालेल्या घडामोडींना आत्महत्येचे कारण समजू नये. किती तरी गोष्टी एकत्र आल्यामुळे व्यक्ती आत्महत्येचा विचार करते. िहस्र पद्धती म्हणजे कुठून उडी मारून, गळफास, बंदुकीच्या गोळ्यांनी.. अशा रीतीने आत्महत्या करणाऱ्यांच्या मज्जासंस्थेत ५-एचआयएए द्रव्य कमी प्रमाणात आढळले आहे. यात आनुवंशिकता आहे. हेिमग्वे नावाच्या सुप्रसिद्ध साहित्यिकाच्या कुटुंबात अनेकांनी आत्महत्या केली आहे. आता १५ ते २५ वर्षांमधील वयोगटांत आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले आहे, ही चिंतेची बाब आहे. या वयोगटात अभ्यासाचा ताण, परीक्षेत अपयश आणि प्रेमभंग ही तीन प्रमुख कारणे आहेत. आणखी एक म्हणजे जगाच्या तुलनेच भारतात स्त्रियांमधील आत्महत्येचे प्रमाण जास्त आहे. सामाजिकदृष्टय़ा दुय्यम स्थान आणि हुंडाबळी ही दोन कारणे यासाठी सांगितली जातात. रागीट, आततायी, हट्टी, टोकाचा परफेक्शनिस्ट आणि अप्रगल्भ असलेल्या व्यक्तींमध्ये आत्महत्येची वृत्ती जास्त असते. मानसिक आजारांमध्येही आत्महत्या घडू शकते. याचे सर्वात जास्त प्रमाण नराश्यात असते. ज्या व्यक्ती आत्महत्येचे विचार करतात, ज्यांना जीव नकोसा वाटतो आणि जे आत्महत्येसाठी नियोजन करतात त्यांच्यात आत्महत्या घडण्याचे प्रमाण जास्त असते. काही वेळेला मनासारखे करून घेण्यासाठी किंवा समोरच्या व्यक्तीला घाबरवण्यासाठी आत्महत्येची धमकी दिली जाते. त्याबद्दल काही केले नाही तर क्रमाने ही सवय वाढून आत्महत्येचा प्रयत्नही केला जातो. असा प्रयत्न यशस्वी होऊन मृत्यू किंवा अपंगत्व येते. कधी कधी व्यक्तींची स्वत:बद्दल हीन भावना होते आणि ते स्वत:ला शिक्षा करण्यासाठी हात कापणे, गळा कापणे असे करतात. याची तीव्रता जास्त असेल तर जिवावर बेतू शकते. वृद्ध व्यक्तींमध्ये प्राण सोडण्याच्या हेतूने खाणे-पिणे पूर्ण बंद केले जाते. याला ‘साइलंट सुसाइड’ म्हणतात. सामूहिक आत्महत्येत एक व्यक्ती आत्महत्येचा विचाराशी ठाम होतो आणि त्याच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तीलाही आत्महत्या करायला प्रवृत्त करतो. यात छोटे मूल असेल तर त्याचा जीव घेतला जातो. आई- मूल, प्रेमिकांचे जोडपे, संपूर्ण कुटुंब, नवरा-बायको असे करू शकतात. अमेरिकेतील एका पंथाच्या पुढाऱ्यांनी विष घेऊन शेकडो शिष्यांसह स्वत:ची आत्महत्या घडवून आणली होती. याबद्दल काय करता येईल? आधी काही काळ विचार येतात आणि नंतर त्याची अंमलबजावणी केली जाते. बहुतेक व्यक्तींना या विचारांचे गांभीर्य कळत नाही. असे विचार येत असतील तर ते गंभीर समजून त्याची तपासणी केली पाहिजे. भित्रा असल्याने एखाद्या व्यक्तीला आत्महत्या करण्याचे धाडस होणार नाही असा तर्क लावू नये. आत्महत्येचे विचार तीव्र झाल्यावर कुणीही त्यांच्या आहारी जाऊ शकते. त्यामुळेच स्वतला किंवा इतर कोणाला असे विचार आले तर ते तपासून घेतलेच पाहिजे. ती व्यक्ती जर तपासणीसाठी येत नसेल तर त्यांच्या कुटुंबीयांनी तरी समुपदेशनासाठी जावे. ज्या कुटुंबात आत्महत्या घडली आहे त्यांना बाजूला टाकू नये. कुटुंबामध्ये आत्महत्येचा प्रयत्न झाला असेल तर लपवून ठेवू नये, योग्य वैद्यकीय उपचार आणि समुपदेशन करून घ्यावे. आत्महत्येमधून कोणाला गमावले म्हणजे ‘सर्व संपून गेले’ असे समजू नये. मागे राहिलेल्या व्यक्तींची काळजी आणि उपचारसुद्धा महत्त्वाचे असतात. परिणाम.. एका संशोधकाने आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या व्यक्तींचा मागोवा काही वर्षांनंतर घेतला. प्रत्येक व्यक्तीने आत्महत्या करण्याचा निर्णय पूर्णपणे चुकीचा होता, असे सांगितले. एका आत्महत्येमागे सरासरी सहा जणांची आयुष्ये उद्ध्वस्त होतात. आत्महत्येचे दृश्य पाहिलेली व्यक्ती कित्येक वर्षे ते विसरू शकत नाही, त्यामुळे त्यांनाही मानसिक आजार होऊ शकतो. त्यांच्या कुटुंबीयांकडे वेगळ्या नजरेने बघितले जाते. आत्महत्या केलेल्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा विमा लागू होत नाही, त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांसमोर आíथक प्रश्न उभे राहतात.