महापालिका निवडणुकीत भाजपशी युती न करण्याचा निर्णयाने राज्य सरकार अस्थिर बनले आहे. या स्थितीत शिवसेना सत्तेत राहणार नाही, ती राहिली तर सत्तेसाठी शिवसेना काहीही करते असा संदेश जाईल, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात मध्यावधी निवडणुकीचे संकेत दिले आहेत. मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांची संभावना ‘मूर्ख माणूस’ अशी करून त्यांचे सार्वजनिक जीवनात योगदान काय, असा सवालही केला. राष्ट्रवादी आणि भाजपची छुपी युती आहे, असे निरुपम म्हणत आहेत, या प्रश्नावर पवार यांनी संताप व्यक्त केला.

कोल्हापुरात शनिवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्यातील भाजप सरकारला पाठिंबा देण्याचा तूर्त विचार नाही. हा निर्णय एकत्र बसून घेण्यात येईल, असेही सांगितले. राज्यात मध्यावधी निवडणुका झाल्या तर समविचारी पक्षांसोबत त्या लढवण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रपतीपदासाठी माझ्या पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नाही. त्यामुळे त्या पदाबाबत मी फार आशावादी नाही, असे म्हणत त्यांनी आपल्या मर्यादा स्पष्ट केल्या. जिल्हा परिषद निवडणुका स्थानिक मुद्दयावर होत असल्याने तेथे काही प्रमाणात मोकळीक असल्याचे पवार यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काँग्रेसमुक्त भारत करण्याची भाषा करतात. स्वातंत्र लढ्यापासून ते देश उभारणीपर्यंत प्रयत्न करण्यात काँग्रेसचे योगदान आहे. त्यामुळे काँग्रेस नष्ट करण्याची भाषा यशस्वी होणार नाही, असे म्हणत शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पवार यांचा सपत्नीक कोल्हापुरात सत्कार कोल्हापुरात करण्यात आला.

ते म्हणाले, काँग्रेस पक्षाशी आम्हीही भांडलो, संघर्ष केला. पण दोन्ही काँग्रेसची विचारधारा एकच असून ती सामाजिक हिताची आहे. स्वातंत्र्यलढ्यावेळी काँग्रेसने प्राणांची आहुती दिली. आज काँग्रेसवर बोलणारी मंडळी या लढ्यात कोठेच नव्हती. देशाची उभारणी करून जगासमोर यशस्वी प्रतिमा काँग्रेसनेच निर्माण केली. भारत लोकसत्ताक देश आहे. देशाच्या सत्तेत येण्यात दोन्ही काँग्रेस कमी पडल्या. पण आता बिघडलेले दुरुस्त करण्याची भूमिका घ्यावी लागेल, असे सांगत उभय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले. याची सुरुवात प्रागतिक विचाराच्या कोल्हापुरातून व्हावी, अशी सूचना त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केली.