वानखेडेवर तिसऱया दिवशी 'कोहली'नामा पाहायला मिळाला. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीमध्ये शतक ठोकल्यानंतर शांत दिसलेल्या कोहलीने वानखेडेवर मात्र शतक गाठल्यानंतर मोठ्या जल्लोषात शतक साजरे केले आणि चाहत्यांना पुन्हा एकदा आक्रमक विराट पाहायला मिळाला. कोहलीच्या नाबाद १४७ धावांच्या जोरावर भारतीय संघाला वानखेडे कसोटीत तिसऱया दिवसाच्या अखेरीस ५१ धावांची आघाडी घेतला आली आहे. तिसऱया दिवसाच खेळ संपला तेव्हा भारताची धावसंख्या ७ बाद ४५१ अशी आहे. कोहलीच्यासाथीला जयंत यादव ३० धावांवर नाबाद आहे. विराटने आपल्या १५ व्या आंतरराष्ट्रीय कसोटी शतकासह यंदाच्या वर्षात १ हजार धावांचा टप्पा देखील गाठला. याशिवाय त्याने कसोटी कारकिर्दीतील चार हजार धावांचा टप्पा देखील ओलांडला. विशेष म्हणजे, इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेतच कोहलीने ५०० धावा कुटल्या आहेत. आजच्या दिवसाच्या खेळाला सुरूवात झाल्याच्या पहिल्याच षटकात भारतीय संघाला मोठा धक्का बसला होता. चेतश्वर पुजारा ४७ धावांवर क्लीनबोल्ड होऊन माघारी परतला. जेक बॉलने पुजाराची विकेट घेतली. पुजारा बाद झाल्यानंतर विराट कोहलीने मुरली विजयला चांगली साथ दिली. मुरली विजयने यावेळी १३६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली, तर कोहलीने मैदानात कर्णधारी खेळी करून आपले १५ वे आंतरराष्ट्रीय कसोटी शतक पूर्ण केले. मुरली विजयने पहिल्या दिवसाप्रमाणेच दुसऱया दिवशी देखील आपला दमदार फॉर्म कायम ठेवत कसोटी कारकिर्दीतील आपले ८ वे आंतरराष्ट्रीय शतक ठोकले. उपहारापर्यंत भारताने २ बाद २४७ धावा केल्या होत्या. दुसऱया सत्रात मुरली विजय फिरकीपटू रशीदच्या फूलटॉस चेंडूवर स्ट्रेड ड्राईव्ह मारण्याच्या नादात झेलबाद झाला. मुरली विजयने १३६ धावा केल्या. मुरली विजय बाद झाल्यानंतर करुण नायर मैदानात दाखल झाला. करुण नायरने पहिल्या चेंडूवर चौकार मारून दमदार सुरूवात केली खरी पण तो मोईन अलीच्या फिरकीवर १३ धावांवर पायचीत होऊन माघारी परतला. इंग्लंडच्या गोलंदाजांना यश मिळत नसताना जो रुटला गोलंदाजीसाठी पाचारण करण्यात आले आणि त्याने आपल्या पहिल्या दोन षटकांत दोन विकेट्स घेऊन भारतावर दबाव निर्माण करण्यात यश मिळवले. जो रुटने पार्थिव पटेल याला २५ धावांवर तर अश्विनला शून्यावर बाद केले. विराट कोहलीने यावेळी पुन्हा एकदा आश्वासक खेळी करून संघाला सावरले. तत्पूर्वी, कसोटीच्या दुसऱया दिवसाच्या अखेरीस भारतीय संघाने एका विकेटच्या मोबदल्यात १४६ धावा केल्या होत्या. पुजारा आणि मुरली विजय जोडी तिसऱया दिवशी देखील इंग्लिंश गोलंदाजांच्या नाकी नऊ आणेल अशी आशा होती. पण इंग्लंडच्या जेकब बॉलने भारताचे मनसुबे फोल ठरवले. त्याने आपल्या पहिल्याच षटकात पुजाराला क्लीनबोल्ड करून माघारी धाडले. इंग्लंडने पहिल्या दिवशी किटन जेनिंग्सच्या पदार्पणीय शतकाच्या बळावर पावणेतीनशे धावांपर्यंत मजल मारली होती. मात्र धावांचा हा ओघ त्यांना दुसऱ्या दिवशी राखता आला नाही. फक्त ११२ धावांत इंग्लंडचा उर्वरित निम्मा संघ गारद झाला. इंग्लंडला सव्वातीनशे धावांत रोखू, असे अश्विनने गुरुवारी आत्मविश्वासाने सांगितले होते. पण त्याच्या आशा फोल ठरल्या. तळाच्या फलंदाजांना साथीला घेत जोस बटलरने (७६) झुंजार खेळी उभारली. त्यामुळे इंग्लंडला चारशे धावांपर्यंत पोहोचता आले. इंग्लंडने वानखेडेवरील सलग तिसऱ्या कसोटीत चारशे धावांचा टप्पा ओलांडून भारतावरील दडपण वाढवले आहे. याआधी २००६मध्ये ४०० आणि २०१२मध्ये ४१३ धावा उभारल्यानंतर ते दोन्ही कसोटी सामने भारताने जिंकले होते. Cricket Score , India vs England : दिवसभरातील अपडेट्स