शहरयार खान यांची सूचना

भारत-पाकिस्तान यांच्यातील प्रस्तावित क्रिकेट मालिका महिनाभरात झाली नाही, तर पुढील वर्षभरात ती होणे कठीण आहे, असे मत पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) प्रमुख शहरयार खान यांनी व्यक्त केले आहे.
‘‘२०१६ मध्ये दोन्ही देशांचे संघ वर्षभर क्रिकेट सामन्यांमध्ये व्यग्र आहेत. त्यामुळे जानेवारीपर्यंत ही मालिका झाली नाही, तर पुढील वर्षभर तरी ती अशक्य आहे,’’ असे खान यांनी सांगितले.
ते म्हणाले, ‘‘मालिकेचा निर्णय अद्याप भारताने घेतलेला नाही, मात्र विश्वचषक ट्वेन्टी-२० स्पध्रेबाबतचा निर्णय हा स्वतंत्र विषय आहे. कारण मालिका हा दोन देशांमधील प्रश्न आहे, तर विश्वचषक स्पर्धा आयसीसी घेते. परंतु या स्पध्रेसाठी भारतात संघ पाठवण्याकरिता आमच्या सरकारची परवानगी लागेलच.’’