खाणं म्हटलं की अनेकांच्या डोळ्यांसमोर बऱ्याच प्रकारचे, आकारांचे आणि नावांचे खाद्यप्रकार तरंगू लागतात. त्यातच काही खाद्यपदार्थाना विशेष पसंती दिली जाते. अशाच काही खाद्यपदार्थाची चव त्या ठिकाणी जाऊन चाखल्यावर त्याची बात काही औरच. गेल्या काही वर्षांमध्ये जीवनशैलीचं बदलतं रूप आणि त्याला मिळालेली आधुनिकतेची जोड पाहता खाण्याच्या बाबतीतही काही नव्या ट्रेण्ड्सचा जन्म झाला आहे. यामधील एक ट्रेण्ड म्हणजे फिरणं आणि खाणं किंवा मग खाण्यासाठी फिरणं.. फिरस्ता हा खवय्या असला की तो जसं जागेचं मूळ शोधून काढतो तसंच तिथल्या खाण्याचं कूळही शोधत जातो. फिरता फिरता चांगलं खाणं शोधणाऱ्यांची तऱ्हा किती वेगवेगळ्या.. पूर्वी या अशा फिरस्त्यांना ‘छांदिष्ट’ किंवा साध्या-सोप्या भाषेत कुठलं तरी ‘वेड’ पिऊन वाहणारे वारे.. इतकी सोपी उपमा देऊन वाऱ्यावर सोडलं जायचं. कधी तरी त्यांनी मित्रमंडळींना जमवून किस्से सांगितले तर नाही तर एखादं पुस्तक छापलं तर त्यांचे हे अनुभव लोकांपर्यंत पोहोचायचे. मात्र आधुनिक युगात आपल्या प्रत्येक आवडीचा व्यवसाय करण्याची एक सोय तंत्राने करून ठेवली आहे. आणि ती सोय या फिरस्त्यांच्या पथ्यावर पडली आहे. त्यामुळे स्टुडिओच्या बंद जागेत चकचकीत स्वयंपाकघर उभारून तिथे लखनऊचे कबाब बनवण्यापेक्षा चक्क नवाबांच्या शहरात जाऊन तिथल्या हवेलीत फिरताना त्यांच्याच शाही स्वयंपाक्याकडून कबाब करता करता लखनऊचा इतिहास ऐकवणं शेफपासून, भटक्यांपर्यंत सगळ्यांसाठी चलनी नाणं ठरलं आहे. अशा फिरस्त्या खवय्यांची एकच लाट सध्या लाइफ स्टाइल वाहिन्यांपासून यूटय़ूबपर्यंत सगळीकडे आहे आणि याबाबतीत पंचतारांकित हॉटेल्समधून काम करता करता नावारूपाला आलेले शेफही मागे राहिलेले नाहीत. हर एक शोपे लिखा है.. ‘दाने दाने पे लिखा है खानेवाले का नाम..’ या धर्तीवर इथे हर एक शो पे लिखा है बनानेवाले का नाम.. असं म्हणावं इतकं वैविध्य या शोच्या संकल्पनांमध्ये आहे. त्यामुळे फक्त फिरण्याची आणि खाण्याची आवड असणारी मंडळीच नव्हे तर नावीन्याची उत्सुकता असणारा कोणीही माणूसप्राणी या शोकडे सहज ओढला जातो. बाकीचे काम चक्षूसमोर दिसणारे नवनवीन पदार्थ आणि त्याचा भवताल पूर्ण करतात. ‘हायवे ऑन माय प्लेट’ कार्यक्रमातील रॉकी आणि मयूर असोत, ‘पिकल नेशन’मधील शेफ कुणाल कपूर असो, ‘चख ले इंडिया’मधील आदित्य बल असो किंवा शेफ विकास खन्ना, रोहन पाटोळे किंवा शेफ गौतम मेहृषी असो. गेल्या काही वर्षांमध्ये ही नावं बरीच चच्रेत आली. ती चच्रेत येण्याची कारणं म्हणजे जगभर फिरता फिरता तिथले पदार्थ ओळखीचे करून देणारे त्यांचे कार्यक्रम, प्रत्येकाची नवीन संकल्पना आणि ती सादर करणाऱ्यांची अनोखी शैली. या शोच्या लोकप्रियतेची नेमकी कारणं कोणती आहेत? खाणं आणि भटकणं हे अनेकांसाठी उपजत वेड असल्याने हे शो लोकप्रिय ठरतात का?, या अशा प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न ‘व्हिवा’ने केला. आणि त्यासाठी खुद्द अशा शोमधून आपला ठसा उमटवणाऱ्या शेफ रणवीर ब्रार यांनी ‘ट्रॅव्हल आणि फूड’च्या या नव्या ट्रेण्डमागची कारणं आणि स्वत:चा अनुभवही शेअर केला. सेलिब्रिटी शेफ म्हणून नावारूपाला आलेला रणवीर ब्रार यांचा चेहरा आज घराघरांत ओळखीचा आहे. ‘ब्रेकफास्ट एक्स्प्रेस’, ‘स्नॅक अटॅक’, ‘होममेड’, ‘द ग्रेट इंडियन रसोई’, ‘रणवीर्स कॅफे’, ‘फूड ट्रीिपग’, ‘थँक गॉड इट्स फ्राय डे’ हे त्याचे काही गाजलेले टेलिव्हिजन शो आहेत. रणवीर ब्रारच्या कार्यक्रमांची नावं जितकी रंजक आहेत तितकेच हे कार्यक्रमही रंजक. कारण यापकी बऱ्याच कार्यक्रमांतून खाण्याच्या निमित्ताने विविध ठिकाणांना आणि त्या ठिकाणच्या जीवनशैलीला जवळून पाहण्याची संधी शेफला मिळाली आहे. पण, आजच्या धावत्या जीवनशैलीत प्रत्येक ठिकाण आपल्याला पाहता येणार नाही. मात्र एखाद्या लोकप्रिय पदार्थाविषयी ऐकताना तो क सा जन्माला आला, याची रंजक कथा आणि ते स्थान समजून घेण्याची, ‘दावत-ए-सफर’ करण्याची ही संधी आमच्याबरोबर अप्रत्यक्षरीत्या प्रेक्षकांनाही मिळते, असं रणवीरने सांगितलं. अर्थात या शोच्या यशामागे खुद्द त्या व्यक्तीचा खाद्यपदार्थावरचा अभ्यास, एखाद्या जागेचा इतिहास शोधण्याची, तिथल्या स्थानिकांना विश्वासात घेऊन आपल्याला हवी ती माहिती काढण्याची आणि लोकापर्यंत पोहोचवण्याची हातोटीही तितकीच महत्त्वाची ठरते, असं तो आग्रहाने सांगतो. ‘व्हिवा’च्या या खास अंकासाठी माहिती देताना रणवीरने फुड अॅण्ड ट्रॅव्हल शोदरम्यानचा त्याचा लखनऊचा खास अनुभव सांगितला आहे. ‘मी मुळचा लखनऊचाच असल्यामुळे माझ्यावर तिथल्या खाद्यपदार्थाचा जास्त प्रभाव आहे. लखनऊचे ‘कबाब उस्ताद’ मुनिर अहमद यांच्या सान्निध्यात कबाब बनवण्याची प्रदीर्घ प्रक्रिया समजून घेतली. ते करीत असतानाच मला पाककलेची आवड आहे, यात रस वाटतोय हे लक्षात आलं. आणि तेव्हाच या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला,’ असं सांगणाऱ्या रणवीरने करिअरची ही वाटचाल फक्त यशाकडे नेणारी नव्हे तर आपल्या आवडीला एक निश्चित दिशा देणारीही ठरल्याचं सांगितलं. तुम्ही शोसाठी का होईना एखाद्या जागी नुसतेच फिरत नाही. तिथली प्रत्येक गोष्ट समजून घेता, अभ्यास करता. माझ्याच बाबतीत सांगायचं तर आजवर खाण्याच्या निमित्ताने बऱ्याच ठिकाणी मी फिरलो आहे. स्वत: लखनऊचा आहे पण आजही माझ्या कलेविषयी बोलताना लखनऊची खाद्यसंस्कृती ही माझ्यासाठी जास्त प्रभावी ठरली आहे. इथले कबाब म्हणजे आहाहा..! इथल्या कबाबांबद्दल सांगावं, बोलावं, लिहावं आणि ऐकावं तितकं कमीच आहे. पण, त्यातही माझ्या काही आवडीच्या कबाबांमध्ये टुंडे कबाब, सखावत कबाब हे विशेष आवडीचे आहेत. आणि मग या कबाबवरचं प्रेम मला स्वस्थ बसू देत नाही. ते पदार्थ मूळचे कुठले, ते बनवण्याची पद्धत, त्यासाठी लागणारी सामग्री आणि ती वापरण्याचं कसब हे समोरच्याकडून काढून घेणं आणि मग प्रेक्षकांसाठीही त्यांच्याकडून वदवून घेणं हे महत्त्वाचं ठरतं, असं त्याने सांगितलं. ‘फुड-ट्रॅव्हल’च्या ट्रेण्डमध्ये हीच शैली सर्वात महत्त्वाची असते. कोणत्याही ठिकाणी किंवा कोणत्याही अनोळखी व्यक्तीला भेटल्यावर त्यांच्याकडील पदार्थाची मनापासून प्रशंसा करीत त्या पदार्थाविषयी जाणून घेण्यासाठीची उत्सुकता आणि त्या ठिकाणाला भेट दिल्याचा आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसताच क्षणी अर्धेअधिक काम होऊन जातं. तसं पाहायला गेलं तर फक्त रणवीरच नव्हे तर इतरही सेलिब्रिटी शेफ आणि फूड- ट्रॅव्हल शोची धुरा सांभाळणारे चेहरे या कामात पारंगत आहेत.‘मिया गल्लीबोळात, कुठल्या तरी कोपऱ्यात, कोणा एका प्रसिद्ध ठिकाणी किंवा मग स्थानिकांच्या घरी जाऊन त्या ठिकाणची खाद्यसंस्कृती आणि काही प्रसिद्ध ठिकाणांचा सुगावा घेत ही मंडळी तिथवर पोहोचवतात आणि मग दृश्यरूपाने पंजाबची लस्सी-मक्के दी रोटी-सरसों का साग, केरळाच्या समुद्रकिनारी बसून गरमागरम रस्सम्भात, गुजरातची थाळी, दिल्लीच्या चांदनी चौकातली खाद्यजत्रा आपल्यापर्यंत पोहोचते, मनात उतरते. त्यामुळेच की काय पण या फिरस्त्या खवय्यांचं आणि त्यांच्या शोचं महत्त्व अमाप वाढलंय! viva@expressindia.com