माझ्या लहानपणी खूप खूप हवी असणारी कलिंगडे बहुधा एप्रिल, मे महिन्यातच फळबाजारात किंवा हातगाडीवर मिळत असत. मात्र अलीकडे लहान-मोठय़ा रस्त्यांवर ऑक्टोबर, नोव्हेंबरपासून ते थेट मे, जून महिन्यापर्यंत कलिंगडाच्या लाल लाल फोडी रस्त्यावरून जाणाऱ्या खवैय्यांना भुरळ पाडतात. कलिंग (संस्कृत), तर्बुज (हिंदी), तर्मुज (बंगाली), तर्बुजि (तेलुगू), बचंग (कोंकणी) अशा विविध नावांनी हे फळ संबोधले जाते. अत्यंत रूक्ष हवामानात नापीक जमिनीत किंवा ओबडधोबड पहाडावर ते होते. याला नाममात्र पाणीपुरवठा लागतो. कलिंगड गुणाने अत्यंत शीत असून उत्तम टॉनिक आहे. खूप रुची देणारे आणि शरीरातील लघवीचे प्रमाण वाढवणारे फळ आहे. कलिंगडाच्या बिया वापरून लागवड केली जाते. या बियांत फिक्कट पिवळसर रंगाचे तेल असते. माझ्या लहानपणापासून कलिंगड फळांचा आस्वाद गर्भिणी स्त्रीने कदापि घेऊ नये, अशी ताकीद दिली जायची. एका ज्ञानवृद्ध मित्राच्या मुलीला ‘दिवस गेलेले’ असताना ‘तू कलिंगड अजिबात खाऊ नकोस,’ असा गंभीर इशारा देऊनही ती दीर्घकाळ कलिंगड खात राहिली. बाई बाळंतीण झाली. मुलाच्या जन्माबरोबरच ती ‘देवाघरी गेली.’ फक्त बाळ वाचले. ही सत्यकथा मला अजूनही खूप टोचणी देते. काजू आपल्या घरात जेव्हा लहान मुले दंगा करतात, तेव्हा आई-वडील चटकन चॉकलेट किंवा टॉफी देऊ पाहतात. माझे वडील माझ्या लहानपणी आमचे खाण्यापिण्याचे खूप लाड करायचे. ते म्हणायचे, ‘भरपूर व्यायाम करा, दूध प्या व सुका मेवा खा.’ सुक्या मेव्यात अग्रक्रम येतो तो काजूचा. हिज्जली बदाम (हिंदी.), गेरू (कन्नड.), कचुमाक (मल्याळम), जीडिमा मिडि (तेलुगू) अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या काजूच्या बोंडापासून कोकण, मलबार, तामिळनाडू या प्रदेशात विविध तऱ्हेचे मद्य तयार केले जाते. मोहडय़ाच्या दारूने जरा त्रास होतो, तसा त्रास काजूच्या दारूने होत नाही. काजू उष्णवीर्य. अधिक काजू खाल्ल्यामुळे लघवीचे प्रमाण वाढते. शरीरातून पुरेसा घाम बाहेर येतो. काजूची दारू उष्ण, तीक्ष्ण, सौमनस्यजनन आहे. ओल्या काजूच्या वरची फिकट तपकिरी साल काढून ते खाण्याचा आनंद कोकणातील सर्वच लहानथोर घेतात. काजूबर्फी, काजू कतली ही मिष्टान्ने आणि खारे काजू लोकप्रिय आहेत. आपल्याकडे मेजवानीसाठी नारळीभात, शाही पुलाव, शिरा तयार केला जातो. या पदार्थातही काजूचा वापर केला जातो.