चंद्रपूर जिल्ह्य़ात रविवारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. पाऊस सुरू असतांनाच चिमूर, अहेरी, विसापूर, राजुरा व गोंडपिंपरी येथे वीज कोसळल्याने १० जणांचा मृत्यू झाला तर,१० जण गंभीर जखमी झाले.
गोंडपिंपरीत शेतात काम करणाऱ्या पारडी येथील लैलाबाई गेडाम (४५) व पोडसा येथील गौतम नारायण मानकर (२८) यांच्या अंगावर वीज पडून घटनास्थळीच मृत्यू झाला. चिमूर तालुक्यातील म्हासली येथील इंद्रजित नामदेव नन्नावरे (३५) हे पावसापासून बचावासाठी मित्रासह झाडाखाली थांबले तेव्हा वीज कोसळून त्यांचा मृत्यू झाला, तर मित्र जखमी झाला. तसेच राजुरा तालुक्यात ३, विसापुरात एका महिलेचा आणि अहेरी तालुक्यातील असपल्लीत दोघांचा मृत्यू, तर ९ जण गंभीर जखमी व कोरपना तालुक्यातील वनसडी येथे एका युवकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. या युवकाचे नाव कळू शकले नाही.