डॉक्टरांना मारहाण आणि हल्ला करणाऱ्यांना शिक्षा व्हावी म्हणून राज्य सरकारने कडक कायद्यांची अंमलबजावणी केली आहे. तरीही गुन्हा शाबूत होण्याचे प्रमाण घटत असेल तर गृहविभाग निश्चित गंभीरपणे दखल घेईल. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बैठक घेण्यासाठी आग्रह करू, असे राज्याचे अर्थ, नियोजन, गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले. म्हैसाळ येथे घडलेल्या भृणहत्येचा निषेध करत धुळे जिल्ह्य़ातील डॉ. रोहन यांना झालेल्या अमानुष मारहाणीत त्यांचा एक डोळा कायमचा निकामी झाला म्हणून राज्यभर सुरू असणाऱ्या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर सिंधुदुर्गातील सुमारे सहाशे खासगी डॉक्टरांनी एक दिवसाचा बंद पाळत निषेध केला. सावंतवाडीतील खासगी सुमारे ६० डॉक्टरांनी पालकमंत्री दीपक केसरकर व प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांना निवेदन दिले. यावेळी सावंतवाडी मेडिकल असोसिएशनने डॉ. राजेश नवागुळ यांनी डॉक्टरांना मारहाणीचे प्रमाण वाढत आहे आणि शिक्षेचे प्रमाण घटत आहे. त्यावर सरकारने गंभीरपणे विचार करावा, असे सांगत न्यायालय, संविधानाचा सन्मान आम्ही करतो, असे सांगत जिल्ह्य़ात खासगी डॉक्टरांनी बंद पाळून मारहाणीचा निषेध केल्याचे स्पष्ट केले. सिंधुदुर्गातही डॉक्टर भीतीच्या छायेखाली आहेत असे डॉ. नवांगुळ म्हणाले. रुग्णालयाची तपासणी करावी, पण मानसिक त्रास थांबवावा, असे डॉ. शंतनु तेंडोलकर यांनी सांगितले. जिल्ह्य़ात आरोग्य सेवा देण्यासाठी सर्वाचा प्रामाणिक प्रयत्न आहे असे डॉ. अजय स्वार, डॉ. मिलिंद खानोलकर, डॉ. कश्यप देशपांडे, डॉ. दत्ता सावंत म्हणाले. यावेळी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर म्हणाले, न्यायालयाच्या निर्णयाला सर्वानी स्वीकारावे. म्हैसाळ प्रकरण निंदनीय आहे. पण डॉक्टरांवर हल्ले करणाऱ्यांना कडक शिक्षा व्हावी म्हणून कायदे करण्यात आले आहेत; राज्यातील मोठय़ा रुग्णालयांनी सुरक्षारक्षक ठेवले पाहिजेत, असे केसरकर म्हणाले. धुळ्यात डॉक्टरवर हल्ला करणाऱ्याला अटक झाली. पण त्यातील एकाचा मानसिक संतुलन बिघडल्याने कोठडीतच मृत्यू झाला. राज्य शासन गंभीर आहे, असे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर म्हणाले. डॉक्टरांना मारहाण व हल्ले करणारे निर्दोष सुटत असतील तर दक्षता घेतली जाईल. त्यासाठी मुख्यमंत्र्यांना एक आढावा बैठक घेण्यासाठी विनंती केली जाईल, असे ते म्हणाले. कायद्याची अंमलबजावणी करताना दुसऱ्याला त्रास होणार नाही म्हणून दक्षता घेतली जाईल. सोनोग्राफीबाबतही दक्षता घेण्याची गरज राज्यमंत्री केसरकर यांनी व्यक्त करून वैद्यकीय सेवा देणाऱ्या व लोकांचे प्राण वाचविणाऱ्या डॉक्टरांवर हल्ले, मारहाण होऊ नये म्हणून लोकांनी सहकार्य करायला हवे, असे पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले. आपण शनिवारी मुंबईत गेल्यावर यासंबंधी एक बैठक बोलावली जाईल आणि डॉक्टरांच्या संघटनेच्या प्रतिनिधींना बोलावले जाईल, असे पालकमंत्री केसरकर म्हणाले. यावेळी सावंतवाडीतील सुमारे ६० डॉक्टर उपस्थित होते. यामध्ये डॉ. राजेश नवांगुळ, डॉ. अमुल पावसकर, डॉ. शंतनु तेंडोलकर, डॉ. अजय स्वार, डॉ. मिलिंद खानोलकर, डॉ. कश्यप देशपांडे, डॉ. राजशेखर कार्लेकर, डॉ. अभिजीत वझे, डॉ. अमृत गावडे, डॉ. रेवणसिद्ध खटावकर, डॉ. अरविंद खानोलकर, डॉ. गार्गी पेठे, डॉ. दर्शेश पेठे, डॉ. दत्ता सावंत, डॉ. गोविंद जाधव, डॉ. प्रशांत बाड, डॉ. वाय. एन. सावंत, डॉ. स्वप्ना जाधव, डॉ. कशमा देशपांडे, डॉ. सुरज देशकर, डॉ. शुभदा करमळकर, डॉ. सुबोधन कशाळीकर, डॉ. कौस्तुभ लेले, डॉ. श्रेयस मांगलेकर, डॉ. शिवराम पई, डॉ. निनाद पटवर्धन, डॉ. शंकर सावंत, डॉ. राघवेंद्र तळेगावकर, तसेच खासगी डॉक्टर मोठय़ा संख्येने उपस्थित होते.