नाशिक जिल्ह्यातील मनमाड-येवला रस्त्यावर रविवारी पहाटे व्हॅन आणि मालट्रक यांच्यात झालेल्या अपघातात सहा जण ठार झाले, तर तिघे गंभीर जखमी आहेत. हे सर्व जण मध्य प्रदेशातील इंदूरजवळील राहणारे असून, शिर्डी येथे साईदर्शनासाठी निघाले होते.
मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यातील डेहार येथील काही युवक व्हॅनने शिर्डी येथे दर्शनासाठी निघाले होते. रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास मनमाड-येवला रस्त्यावर त्यांची व्हॅन आली असता गोपाळवाडी फाटय़ाजवळ समोरून येणाऱ्या मालट्रकशी धडक बसली. या अपघातात जगदीश बघेर, राकेश बघेर, शैलेंद्र बघेर (३ वर्षे), रवींद्र चव्हाण यांसह एकाचा जागीच मृत्यू झाला. अनिल पटेल या गंभीर जखमीस उपचारासाठी नाशिक येथे नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. इतर जखमींमध्ये राहुल बाडनर, अनिल चंद्रसिंग किराडे, पंकज नारायण बगेर यांचा समावेश आहे.
जखमींवर येवला उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आल्यानंतर अधिक उपचारांसाठी नाशिकला हलविण्यात आले. शैलेंद्रचा अपवाद वगळता सर्व जण २० ते २५ वयोगटातील आहेत. अपघात होताच ट्रकचालक फरारी झाला. अपघातप्रकरणी येवला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.