बॉलीवूड दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन, दिलीप कुमार, कादर खान आणि गायक यो यो हनी सिंग यांच्यानंतर चित्रपट आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री फरिदा जलाल यांचा मृत्यू झाल्याच्या अफवा सोशल मिडीयावर फिरत आहेत. फरिदा जलाल यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त काल सोशल मिडीयावर फिरत होते. याविषयी डीएनए या इंग्रजी वृत्तपत्राने अधिक माहिती गोळा केली असता ही अफवा असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांनी फरिदा यांच्याशी संवाद साधला. त्यावर फरिदा म्हणाल्या की, मी एकदम ठणठणीत आहे. मला काहीही झालेले नाही. काहीही तथ्य नसलेल्या अशा या अफवा कुठून पसरत आहेत हेच मला कळत नाहीये. मला माझे हसूच आवरत नाहीये. पण, गेला अर्धा तास माझा फोन सतत वाजतोय आणि लोक मला एकच प्रश्न विचारत आहेत, की तू कशी आहेस? हे त्रासदायक आहे. लोक अशा अफवा कसे पसरवू शकतात याचे मला आश्चर्य वाटते. लवकरच फरिदा जलाल या इमरान खानच्या आगामी 'सरगोशिया' चित्रपटात काश्मिरी महिलेची भूमिका साकारताना दिसणार आहेत. फरिदा यांचा जन्म १४ मार्च १९४९ रोजी नवी दिल्ली येथे झाला होता. आजपर्यंत त्यांनी दोनशे पेक्षाही जास्त हिंदी चित्रपटात काम केले आहे. तसेच, त्यांनी तेलगू, तमिल, इंग्रजी भाषिक चित्रपट आणि टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम केले आहे. 'शरारत' या मालिकेत त्यांनी जियाच्या आजीची भूमिका साकारली होती. याच भूमिकेसाठी त्या खासकरून ओळखल्या जातात. 'पारस' (१९७१), 'हिना' (१९९१), 'दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे' (१९९५) या चित्रपटांतील भूमिकेकरिता त्यांना फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.